‘महाराष्ट्रातून उद्धवशाही आणि पवारशाही संपुष्टात आली तरच….’; गजानन कीर्तिकरांचा मोठा दावा

‘महाराष्ट्रातून उद्धवशाही आणि पवारशाही संपुष्टात आली तरच….’; गजानन कीर्तिकरांचा मोठा दावा

महाराष्ट्रात जेव्हा उद्धवशाही आणि पवारशाही कमी होईल तेव्हा हे एकनाथ शिंदे शिवशाही आणतील. मराष्ट्रातल्या राजकारणातील पवारशाही संपलीच पाहिजे, असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हटले. शिंदे गटातील प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना गजानन कीर्तिकर यांनी आपल्यासोबत झालेले अपमानाचा पाढा वाचला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. ‘2004 साली उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उत्तर भारतीय असलेल्या व्ही. के. सिंग हा बिल्डर असून, त्याचा भाऊ रमेश सिंग नावाच्या व्यक्तीला तिकीट देण्यासाठी गुप्तगू सुरू होते’, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला. (Shinde Group MP Gajanan Kirtikar Slam Uddhav Thackeray and Sharad Pawar)

शिंदे गटातील प्रवेशानंतर आज खासदार गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कीर्तिकर यांनी आपल्यासोबत झालेल्या आपमानाबाबत आणि ठाकरे गट सोडण्याचे स्पष्टीकरण दिले. “राष्ट्रवादी कॉग्रेसबरोबर शिवसेनेचा जो राजकीय प्रवास सुरू होणार आहे, हा प्रवास शिवसेनेसाठी घातक आहे, असा प्रस्ताव आम्ही उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर आम्हाला प्रतिक्षा होती, की काहीतरी परिबदल होईल. पण तो बदल झालेला नाही”, असे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

“आमचे दुसरे मत असे होते की, आमची शिवसेना एवढी ताकदवार होती की, दसरा मेळाव्याला 2-2 लाखाचे मेळावे होतात. त्यामुळे दोन्हीकडे ताकद बघितली. हीच जर ताकद एकत्र झाली तर, फार मोठा शिवसेना असा पक्ष आहे. म्हणून समेट घडवावा. 40 आमदार गेले, 15 आमदार बाकी आहेत. 12 खासदार गेले आणि मी 13वा खासदार होतो. आता केवळ 5 खासदार बाकी आहेत. भाजपाबरोबर आपली जी नैसर्गिक युती आहे, ती आबादीत ठेवावी. तसेच, भाजपाने मुख्यमंत्रीपद आपल्याला दिलेले आहे. त्याचा लाभ घेऊन संघटना बांधावी आणि शिवसैनिकांची कामे करावी. परंतु, मला तसे काही दिसत नाही आणि या सगळ्यामधून शेवटी मी ठरवले की, फार चुकीच्या मार्गाने उद्धव ठाकरे जात आहेत. राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेससोबत वाटचाल करणार असतील, तर ते शिवसेना आणि पक्षासाठी धोकादायक आहे. आमच्या शिवसेनेच्या भवितव्याला ते धोकादायक आहे”, असेही यावेळी गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.

”मी शिवसेनेत 56 वर्षे आहे. एक निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसेनेचा नेता म्हणून मला ओळखले जाते. पण 2004 साली उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उत्तर भारतीय असलेल्या व्ही. के. सिंग हा बिल्डर असून, त्याचा भाऊ रमेश सिंग नावाच्या व्यक्तीला तिकीट देण्यासाठी गुप्तगू सुरू होते. पण बाळासाहेबांनी तसे काही केले नाही, त्यांनी मला चार वेळा तिकीट दिले. 2004 साली माझी उमेदवारी कापण्याचा प्रयत्न केला होता, पण 2009 साली माझी उमेदवारी कापलीच. त्यावेळी माझा पीए असलेला सुनील प्रभू यालासारखे बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे, असे सांगत होते. तसेच, गजानन कीर्तिकर याला तिकीट देणार नाही, असे बोलत होते”, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तसेच, ‘एवढा मोठा पक्षप्रमुख आणि असा विचार करतो’, असा उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.

तोंड दाबून बुक्क्यांचा मारा

“मी त्यावेळी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मारा’ या म्हणीनुसार केवळ अपमान सहन करत होतो. पण मी कधीच शिवसेना सोडून गेलो नाही. त्यानंतर 2014 आणि 2019 साली एनडीसोबत असताना एक मंत्रिपद मिळाले होते. तेही अरविंद सावंत यांना दिले. तेव्हा तुमच्या ज्येष्ठ शिवसेना नेता गजानन कीर्तिकर का नाही लक्षात आला. त्यानंतर आमचा पक्ष एनडीएच्या विरोधात गेला. दुसरी संसदेमध्येही विनायक राऊत याला पाठवले. तेव्हाही मला डावलले”, असा आरोपही त्यांनी केला.

“40 आमदारांनी बंड करण्यामागे एकच कारण आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठ्या प्रमाणात सत्तेचा फायदा घेत होती. सरकार ठाकरेंचे आणि चालवतात शरद पवार. शिवसेनेच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत होती. त्यामुळे या 40 आमदारांनी बंड पुकारला. 40 आमदार, 12 खासदार निघून जाणे हे देशाच्या राजकारणात याअगोदर कुठेही घडले नव्हते. महाराष्ट्रात जेव्हा उद्धवशाही आणि पवारशाही कमी होईल तेव्हा हे एकनाथ शिंदे शिवशाही आणतील. मराष्ट्रातल्या राजकारणातील पवारशाही संपलीच पाहिजे”, असेही यावेळी गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.


हेही वाचा – गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी मुलगा अमोल कीर्तिकर ठाकरेंसोबतच!

First Published on: November 12, 2022 10:45 AM
Exit mobile version