ठाकरे सरकारमधील पहिला राजीनामा, वनमंत्री संजय राठोड आहेत तरी कोण?

ठाकरे सरकारमधील पहिला राजीनामा, वनमंत्री संजय राठोड आहेत तरी कोण?

पूजा चव्हाण मृत्य प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचं नाव आल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार असल्याचे आरोप भाजपकडून होत आहेत. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर नॉट रीचेबल असलेले संजय राठोड सर्वांसमोर आले आणि त्यांची बाजू मांडली. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं असेल किंवा समाजमाध्यमं असतील, अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची कृपया बदनामी करू नका, असं संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. माझी २० वर्षातील राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं संजय राठोड म्हणाले होते. पण अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

संजय राठोड यांची राजकीय कारकीर्द

संजय राठोड हे बंजारा समाजाचं नेतृत्व करतात. ते शिवसेनेचे विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. संजय राठोड वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणात आले. शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. शिवसेनेने त्यांची जिल्ह्याध्यक्षपदी निवड केली. जिल्हाध्यक्ष पद स्वीकारताच त्यांनी दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी केली. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला ‘संत गाडगे बाबा विमानतळ’ हे नाव देण्यासाठी केलेलं त्यांचं आंदोलन त्यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण विमानतळाला ‘संत गाडगे बाबा विमानतळ’ हे नाव देण्यासाठी धावपट्टी खोदली होती. या आक्रमक आंदोलनानंतर अमरावतीच्या राजकारणात त्यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली.

माणिकराव ठाकरेंना आव्हान

संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये दबदबा असलेल्या काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंना थेट आव्हान दिलं. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. २००४ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २००९ मध्ये दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ मध्ये राठोड यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक मारली. संजय राठोड आता चौथ्यांदा आमदार आहेत. २०१९ मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान असतानाही तब्बल ६० हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि संजय राठोड यांना वनमंत्री पद देण्यात आलं. याआधी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते.


हेही वाचा – राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया


 

First Published on: February 28, 2021 5:38 PM
Exit mobile version