उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला चार बडवे त्यांनीच..,रमेश बोरणारेंचा आरोप

उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला चार बडवे त्यांनीच..,रमेश बोरणारेंचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यानतंर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार भाषणं ठोकली. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला चार बडवे आहेत. त्यांना मी दोष देणार आहे, असा आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांनी केला आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी बोरणारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. याचा आम्हाला आनंद आहे. तसेच बंडखोरी का घडली हे देखील एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. त्यामुळे मी आता अधिक काही बोलणार नाही. गेल्या ३० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करत आहे. एकाच वेळी ५० आमदार पक्षातून निघून जातात. ही गोष्ट समजण्यासारखी आहे. यामुळे मी उद्धव ठाकरेंना दोष देणार नाही. परंतु उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला जे चार बडवे आहेत. त्यांना दोष देणार आहे. त्यांनीच आमच्या सारख्या लोकांना बाजूला सारण्याचं काम केलं आहे, असं रमेश बोरणारे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. आम्ही त्या घराण्याला कधीही विसरू शकत नाही. आम्ही बंडखोरी केली नाही. आम्ही उठाव केला आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याचा कानमंत्र आम्हाला बाळासाहेबांनी दिला आहे. तालुक्याच्या विकासासाठी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. वैजापूर तालुक्यात जे पाच प्रश्न आहेत. ते मार्गी लागणार आहे, असं बोरणारे म्हणाले.

पुढे म्हणाले की, माझ्याकडून जर काही चुकीचे झाले असेल तर २०२४ ला जनता मला माफ करणार नाही. पण जर मी विकासाच्या बाजूने गेलो असेल तर जनता मला नक्की पुन्हा संधी देईल, असं बोरणारे म्हणाले.


हेही वाचा : प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या; सीसीटीव्ही फुटेजमधून घटना उघडकीस


 

First Published on: July 5, 2022 5:02 PM
Exit mobile version