राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची बहुमत चाचणी घेण्यास सांगितले होते. पण आता ते  अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या वातावरणाला पूर्णविराम देत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा काल राजीनामा दिला. ठाकरे यांनी काल संध्याकाळी उशिरा फेसबुक लाईव्ह करत ही घोषणा केली. फेसबुक लाईव्ह दरम्यान सर्वांचे आभार व्यक्त करत उद्धव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडण्याची घोषणा केली. फेसबुक लाईव्हवर राजीनामा जाहीर केल्यानंतर लगेचच ते राजभवनाकडे रवाना झाले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेत बहुमत चाचणी होणार नाही. त्यामुळे विधानसभेचं विशेष अधिवेशन रद्द करत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव यांनी पत्र लिहून तसे संबंधित महाराष्ट्र विधानसभेचे सर्व सदस्य, मंत्री आणि राज्यमंत्र्यांना कळवले आहे.

राज्यपालांनी २८ जून रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन गुरुवार, ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबई येथील विधान भवनात भरविण्यात येत असल्याचे आवाहनपत्र २९ जून २०२२ द्वारे महाराष्ट्र विधानसभेच्या सन्माननीय सदस्यांना नियमांतील नियम ३ अन्वये दिले होते. ज्या प्रयोजनासाठी सदर अधिवेशन अभिनिमंत्रित करण्यात आले होते, ते प्रयोजन आता आवश्यक राहिलेले नसल्याने आता राज्यपाल महोदय यांनी संविधानाच्या अनुच्छेद १७४. खंड (२), उपखंड (क) द्वारे त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून गुरुवार ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन संस्थगित केले आहे, असं राजेंद्र भागवत यांनी विधानसभेच्या सदस्य आमदारांना कळवले आहे.


हेही वाचाः उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले

First Published on: June 30, 2022 8:00 AM
Exit mobile version