Thackeray group : ‘तातू’ पिलावळीचा बोलविता धनी शोधायला हवा, ठाकरे गटाचा राणेंवर निशाणा

Thackeray group : ‘तातू’ पिलावळीचा बोलविता धनी शोधायला हवा, ठाकरे गटाचा राणेंवर निशाणा

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे. एकेरी उल्लेख आणि धमकीवजा भाषा हेच जरांगे यांना अपराधी ठरविण्याचे कारण असेल तर भाजपाच्या फडणवीस टोळीतील अनेक लोक जरांगे यांच्यापेक्षा खालच्या थराची भाषा वापरत आहेत. केंद्रातले मंत्री नारायण तातू राणे आणि त्यांची पिलावळ भाजपात आहे. राण्यांची पिल्लेही याला-त्याला मारण्याची भाषा करतात आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या टोळीचे ‘बॉस’ असल्याचे सांगतात. त्यामुळे जरांगेंचा बोलविता धनी कोण? हे शोधताना या ‘तातू’ पिलावळीचा बोलविता धनी शोधायला हवा, असे सांगत ठाकरे गटाने नारायण राणे यांच्या दोन पुत्रांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Ambadas Danve : ‘एक फूल दोन हाफ’ म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली यादी…

चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय ते सध्याच्या भारतीय जनता पक्षाकडून शिकायला हवे. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न इतक्या दिवसांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपातील टोळीस पडला आहे. जरांगे यांची भाषा ही ठाकरे-पवार यांची भाषा असल्याचा अफलातून शोधही या टोळीने लावला आहे. एखादे प्रकरण अंगलट आले की, त्यातून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न भाजपा नेहमीच करतो. जरांगे पाटील यांच्या बाबतीत तेच घडले आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

जरांगे यांनी 10 टक्के आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती योग्य नाही. फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या बाबतीत भाषेचा वापर मर्यादा राखून करायला हवा. जरांगे हे ग्रामीण भागातील आहेत आणि त्यांनी अंतरवाली सराटीच्या बाहेरचे जग पाहिले नसल्याने बोलताना त्यांचा तोल जातो. दुसरे म्हणजे सततच्या उपोषणांमुळे संपूर्ण शरीर आणि मनावरही परिणाम होतो, पण काही असले तरी वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख, असभ्य भाषा योग्य नाही, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

मराठ्यांना सध्या दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल काय? जर ते आरक्षण टिकणार नसेल तर सरकारकडून समाजाची फसवणूक सुरू आहे, असे जरांगे पाटील म्हणतात. मराठ्यांना ‘ओबीसी’मधून आरक्षण द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते शक्य नाही, असे सरकार म्हणते. कोणाच्याही ताटातले काढून मराठ्यांना आरक्षण नको, तर कोणाच्याही हक्कांना, आरक्षणास हात न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, ही भूमिका सगळ्यांचीच असायला हवी. महाराष्ट्रातील सर्वच समाजात सलोखा राहावा. जात विरुद्ध जात असा संघर्ष गावागावांत उभा राहिला तर महाराष्ट्राच्या एकतेला तडे जातील. तसे होता कामा नये, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका

First Published on: February 28, 2024 11:54 AM
Exit mobile version