व्यापार्‍यांच्या आग्रहाने हटवावे लागले पुण्यातले लॉकडाऊन

व्यापार्‍यांच्या आग्रहाने हटवावे लागले पुण्यातले लॉकडाऊन

पुण्याचे लॉकडाऊन हळूहळू हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे मत होते. मात्र, व्यापार्‍यांच्या आग्रहामुळे पुण्यातले लॉकडाऊन हटवावे लागले, अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. विशेष म्हणजे पुण्यातील २५ ते ३० टक्के नागरिक मास्कचा वापर करत नाहीत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

अजित पवार यांच्यासह पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संबंधित अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. व्यापारी मंडळी लॉकडाऊन उठवायला सांगत आहेत. मग लॉकडाऊन का उठवत नाही. व्यापारी वर्ग सतत विनंती करत होता. व्यापारी वर्गाच्या आग्रहामुळे लॉकडाऊन उठवावा लागला, असं अजित पवार यांनी सांगितले. यावेळी ऑक्सिजनचे सिलिंडर राज्यातल्या काही भागांत मिळत नाहीत. वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची लस येईपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. यावेळी अजित पवारांना पुण्यातील जम्बो रुग्णालयासंदर्भात विचारण्यात आले. पुण्यातील जम्बो रुग्णालयात सगळ्या गोष्टी व्यवस्थित उभ्या केल्या. आज रुग्णालय उघडल्यानंतर ८०० रुग्ण व्हायला वेळ लागेल, असे काहींना वाटले. मात्र, जम्बो रुग्णालयात दोन-तीन दिवसात ३००-४०० पर्यंत रुग्णांची संख्या वाढली, असे अजित पवारांनी सांगितले.

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी- प्रकाश जावडेकर
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला. कोरोनाची लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे. एकजुटीने या संकटाचा सामना करू, असे प्रकाश जावडेकर यांनी आवाहन केले आहे.

नागरिकांनी मास्क वापरणे सक्तीचे असून पुणेकरांनी नियमांचे पालन करावे. मास्कबाबत जनजागृतीची गरज आहे. मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

कोरोनाची चैन तोडणे गरजेचे आहे. कन्टेनमेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. कोरोनाला हरवण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. जनजागृतीसाठी गणपती मंडळ, नवरात्र मंडळ आणि इतर अनेक सामाजिक संस्थांची मदत घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा असून सर्व यंत्रणा एकत्र मिळून काम करतील. कोरोना संबंधित प्रत्येक गोष्टीची ताजी माहिती सर्व यंत्रणांमार्फत दिली जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

First Published on: September 6, 2020 6:51 AM
Exit mobile version