म्हाडाच्या कोकण मंडळाकडून चार हजार घरांची सोडत निघणार, पण कधी? लगेच वाचा

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून चार हजार घरांची सोडत निघणार, पण कधी? लगेच वाचा

मुंबई – मुंबई आणि नजिकच्या शहरात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (Kokan Mandal of Mhada) डिसेंबर अखेरपर्यंत चार हजारांहून अधिक घरांची सोडत निघण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या हद्दीत सोडत निघणार असून सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सोडतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअरची चाचणी यशस्वी झाल्यावर सोडतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

हेही वाचा म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

म्हाडाच्या कोकण मंडळाने १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ८ हजार ९८४ घरांची सोडत काढली होती. यावेळी दोन लाख ४६ हजारांहून अधिक इच्छुक अर्जदारांनी अर्ज केले होते. पात्रता निश्चितीनंतर विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. आता लागलीच वर्षभरात दुसऱ्यांदा सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीसाठी म्हाडाकडून तांत्रिक चाचपणी सुरू आहे, ती पूर्ण होताच सोडतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

कोकण मंडळाकडून जाहीर होणाऱ्या सोडतीमध्ये म्हाडा योजना, पंतप्रधान आवास योजना आणि खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या २० टक्के घरांचा समावेश असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, म्हाडाला २० टक्के योजनेतून मिळणाऱ्या होणाऱ्या घरांमध्ये १५०० घरांचा समावेश आहे.

हेही वाचा – म्हाडा सोडत प्रक्रियेत होणार मोठे बदल, अर्ज भरतानाच जमा करावी लागणार कागदपत्रे

काही दिवसांपूर्वी म्हाडा प्राधिकरणाने (MHADA) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत (Deposit) कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आलाय. मात्र, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम वाढवण्यात येणार आहे. मात्र ही वाढ किती असेल हे अद्यापही सांगण्यात आलेले नाही. परंतु, घराच्या एकूण रकमेच्या एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे.

First Published on: November 23, 2022 9:59 AM
Exit mobile version