वाहतुक कोंडी तरी दिवाळीची खरेदी उत्साहात

वाहतुक कोंडी तरी दिवाळीची खरेदी उत्साहात

वाहतुक कोंडी (प्रातिनिधीक फोटो)

दिवाळीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठा आणि ग्राहकपेठांच्या परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी असली तरी नागरिकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत दिवाळी निमित्त खरेदीसाठी शहरासह संपूर्ण जिह्यातील नागरिकांचा ओघ वाढला आहे. मात्र वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही दुचाकी वाहनचालक गर्दीतूनच वाट काढत वाहन चालवत आहेत. इतकेच नव्हे तर काहीजण दुकानालगतच वाहने उभी करत आहेत. आधीच आपल्या दुकानासमोर आपली वाहने उभी करून दुकानदारांनी जागा अडवून ठेवल्या आहेत. त्यातच उरलेल्या जागेत बाहेरील वाहनचालक आपली वाहने थांबवत आहेत.

हेही वाचा – ऐन दिवाळीत जनतेच्या ‘गैर’सोयीचा सप्ताह!

वाहतूकीच्या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे

काही ठिकाणी वाहतुक विभागाने ‘नो एंट्री’ बोर्ड लावले आहेत. तरीदेखील त्याला न जुमानता वाहन चालवण्याचा प्रयत्न होत आहे. ठाणे शहरातील मोठ्या मैदानांमध्ये सध्या ग्राहकपेठा सुरू आहेत. गावदेवी मैदान, भगवती मैदान, गोखले रोड, राममारुती रोड, घंटाळी मंदिर परिसर या ठिकाणी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. संध्याकाळी ही कोंडी वाढते. जांभळीनाका बाजारपेठेतील या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. मात्र प्रचंड गर्दी असल्याने वाहतूक पोलिसांची कुमक कमी पडत आहे.

हेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात!!

भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले

दरम्यान गर्दीचा फायदा उचलून हात साफ करणारी भुरट्या चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. नवी मुंबईतील दाम्पत्याने तलावपाळीजवळ पार्क केलेल्या गाडीची काच फोडून १० हजारांच्या रोख रकमेसह ३५ हजारांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तर बाजारपेठ परिसरात ठाणे महापालिकेच्या एका महिला नगरसेविकेचे पाकिटच मारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. अशा घटनांवर नियंत्रण रहावे म्हणून बाजारपेठ परिसरात दोन पोलीस उपनिरीक्षक आणि १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सणासुदीचे दिवस असल्यामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी होत असली तरी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी कार्यरत आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असून चार दिवसात सुमारे १८० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहतूक विभागाने सुमारे १८ हजारांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
– सुरेश लंबाते, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा


हेही वाचा – दिवाळी खरेदीच्या वेळी चोर्‍या रोखण्यासाठी कुरेशींची जागृती

First Published on: November 7, 2018 4:47 PM
Exit mobile version