ढेकणांना चिरडायला गोळीबार करायचा नसतो; उद्धव ठाकरेंचा टोला

ढेकणांना चिरडायला गोळीबार करायचा नसतो; उद्धव ठाकरेंचा टोला

रत्नागिरीः बाळासाहेबांनी मला शिकवलं आहे की ढेकणांना मारायला तोफ वापरायची नसते. गोळीबार करायचा नसतो. ढेकणं पायाखालून चिरडायची असतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांना लगावला.

रविवारी उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे व भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ही सभा सुरू आहे, त्या मैदानाचे नाव सुद्धा गोळीबार मैदान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे की, ढेकणं चिरडायला तोफांची गरज नाही. ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  भाजपा तसेच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
ही ढेकणं आपले रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरज नाही. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणांना चिरडणार आहे. तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना नाव आणि पक्ष माझ्या वडिलांनी दिले आहे. निवडणूक आयोगाने हे दिलेले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांना बोलवा येथे. त्यांना ही गर्दी दाखवा. हीच खरी शिवसेना आहे. हो मी शिवसेनाच म्हणणार आहे. कारण शिवधनुष्य रावणाला नाही पेलवले तर या गद्दारांना कसे पेलवणार. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला मान्य नाही. मान्य होणारच नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वच उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. आणि काचा फुटलेल्या एसटीवर लिहिलेले असते की गतिमान महाराष्ट्र. कसला गतिमान महाराष्ट्र. तरुणांचे रोजगार गेले. शेतकरी हवालदिल आहे. असे असताना लाज नाही वाटत गतिमान महाराष्ट्र म्हणायला. माझी जाहिरात होती की माझे कुटुंब. होय हे माझेच कुटुंब आहे. तुमच्यासारखे खोटे बोलत नाही.

उद्धव ठाकरे हे भाषणाला येताच फटक्यांची आतिषबाजी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले असाच आपल्याला धमका करायचा आहे.

 

 

 

First Published on: March 5, 2023 7:41 PM
Exit mobile version