आनंदाची बातमी! कोकणवासीयांची गणपतीवारी सुखकर; वंदे भारतला कणकवलीत थांबा

आनंदाची बातमी! कोकणवासीयांची गणपतीवारी सुखकर; वंदे भारतला कणकवलीत थांबा

वंदे भारत ट्रेनला कणकवली स्थानकावर थांबा देण्यात यावा, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रम असलेल्या या गोष्टीबाबत आता स्पष्टता मिळाली असून वंदे भारत ट्रेनला कणकवलीत थांबा देण्यात आलेला आहे.

येत्या 3 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत ट्रेन धावणार आहे. त्यामुळे कोकणवासियांमध्ये आधीपासूनच आनंदाचे वातावरण आहे. पण आता कोकणवासियांसाठी आणि विशेष करून सिंधुदुर्गवासीयांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेनला कणकवली स्थानकावर थांबा देण्यात यावा, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रम असलेल्या या गोष्टीबाबत आता स्पष्टता मिळाली असून वंदे भारत ट्रेनला कणकवलीत थांबा देण्यात आलेला आहे. (Vande Bharat train will have a halt at Kankavli)

वंदे भारत ट्रेनला कणकवली रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. तर आमदार नितेश राणे हे या मागणीचा सतत पाठपुरावा करत होते. त्यामुळे त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे वंदे भारत आता कणकवली स्थानकातही थांबणार असल्याचे बोलले जात आहे.

 

कणकवली स्थानकात या ट्रेनला थांबा देण्यात येणार असल्याने याचा मोठा फायदा गणपतीमध्ये होणार आहे. तर या निर्णयामुळे कोकणवासीयांची गणपतीवारी आणखी सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कोकणात गणपतीत जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही अधिक असते. आधीच गणपतीतील ट्रेनच्या बुकिंग या फुल्ल झालेल्या आहेत. त्यामुळे कोकणवासी या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.

नारायण राणे आणि अश्विनी वैष्णव यांच्या या भेटीत इतर गोष्टींवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सव तिकीट बुकिंगबाबत आरोपांसंदर्भात व अधिकच्या हॉलिडे स्पेशल ट्रेन संदर्भात योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन वैष्णव यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच, तुतारी एक्सप्रेसला सिंधुदुर्गात नांदगाव येथे थांबा देण्याला मान्यता देण्यात आली आहे. तर कोकण पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या मिनी टॉय ट्रेनबाबत देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास देखील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे.

5 जूनपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सकाळी 5.35 वाजता सुटेल आणि गोव्यातील मडगावला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. ही ट्रेन सकाळी ठाण्यात सकाळी 6.05 वाजता, पनवेल येथे 6.40 वाजता, खेड येथे 8.40 वाजता, रत्नागिरी स्थानकावर 10.00 वाजता आणि कणकवली येथे ही गाडी 11.20 वाजता पोहोचेल, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर मडगावमध्ये दुपारी 1.25 मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35वाजताची असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

तसेच परतीच्या मार्गावर मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे 4.10 मिनिटांनी पोहोचेल. तसेच रायगड जिल्ह्यात रोहा आणि पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री 8.05 वाजता तर पनवेल येथे 9.18 वाजता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

First Published on: May 31, 2023 8:40 PM
Exit mobile version