निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटाचे लेखी उत्तर पोहोचले, युक्तिवादात काय म्हटलंय?

निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटाचे लेखी उत्तर पोहोचले, युक्तिवादात काय म्हटलंय?

Shivsena Conflict in Election Commission | नवी दिल्ली – शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाकडे झालेल्या शेवटच्या सुनावणीनुसार आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करायचा होता. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाने इमेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला उत्तर सादर केले आहे. तर, शिंदे गटाकडूनही शेवटच्या क्षणी उत्तर सादर करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव कोणाच्या वाट्याला जातंय याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतंय याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या लेखी युक्तीवादात काय म्हटलंय?

उद्धव ठाकरे गटाने इमेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला लेखी उत्तर पाठवलं आहे. याबाबत नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, २१ जूनपासून सुरू झालेला घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला लेखी स्वरुपात दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसह निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीचेही मुद्दे या युक्तीवादात मांडले आहेत. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर केलेला दावा कसा चुकीचा आहे याबाबतही या युक्तीवादात मांडलं आहे, असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले.

हेही वाचा – उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही?, घटनातज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

ते पुढे म्हणाले की, आमदार-खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या आहेत. आम्ही तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. तसेच २० लाख प्राथमिक सदस्यत्वाचे पुरावे दिले आहेत. त्यानुसार शिंदे गटाने काय पुरावे दिले, याची पडताळणी करा आणि आम्हाला न्याय द्या. अशी मागणी आयोगापुढे करण्यात आली आहे. हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना पक्ष घटनेनुसार उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख म्हणून मुदत संपली आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ वाढवून देता येऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच शिवसेनेच्या सर्वेोच्च पदावर कोण बसतंय हे ठरणार आहे.

शिंदे गटाच्या लेखी युक्तीवादात काय?

वेळ संपत आली तरीही शिंदे गटाने युक्तीवाद सादर केला नव्हता. मात्र, शेवटच्या क्षणी शिंदे गटाने युक्तीवाद सादर केला. या युक्तीवादात उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे बाळासाहेबांनी तयार केलेली घटना बदलली हे मांडण्यात आलं आहे. तसंच, एकनाथ शिंदेंना दिलेले मुख्य नेते पद हे बाळासाहेबांच्या घटनेनुसारच दिले आहे, असं सांगण्यात आलं आहे. शिंदे गटाकडे लोकप्रतिनिधींचं संख्याबळ जास्त आहे. त्यानुसार, शिंदे गटालाच शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळायला हवे, अशी मागणी आम्ही लेखी युक्तीबाबत केली आहे, असं बाळासाहेबांची शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

हेही वाचा बाळासाहेबांच्या पक्षघटनेनुसारच शिंदेंना नेतेपद, राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण

First Published on: January 30, 2023 6:52 PM
Exit mobile version