मुंबईच्या वरळी कोळीवाडा परिसरतील समुद्रात ५ जण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पाच जणांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण बचावली आहेत. या घटनेत कार्तिक चौधरी (८) व सविता पाल (१२) या दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर कार्तिकी गौतम पाटील (१३), आर्यन चौधरी (१०) व ओम चंद्रजित पाल (१४) हे तिघे बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु कार्तिकी व आर्यन या मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. (5 children drown in sea at Worli Two died three survived)
शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वरळी कोळीवाडा येथील समुद्रात ५ मुले बुडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच, स्थानिकांनीही समुद्रात धाव घेऊन या ५ जणांना समुद्रातून बाहेर काढले. बचाव केलेल्या तीन जणांना केईएम व हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळी, कोळीवाडा येथील वाल्मिकी चौक भागात शेजारी-शेजारी राहणारी दोन मुली व तीन मुले अशी पाच मुले शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिर, विकास गल्ली येथून समुद्रात ओहोटी असताना खेळायला गेली. मात्र खेळताना त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही सर्व मुले समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन बुडू लागली. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली.
सुदैवाने कोळीवाड्यातील जवळील स्थानिक नागरिकांनी या बुडणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी कार्तिकी, आर्यन व ओम या तिघांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र कार्तिक चौधरी व सविता पाल हे दोघेजण थोडं दूर अंतरापर्यन्त म्हणजे नरिमन भाट या ठिकाणी वाहून गेले. त्याठिकाणी शोध घेतल्यावर ते दोघे सापडले. कार्तिकी पाटील हिला केईएम रुग्णालयात तर उर्वरित चौघांना नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी कार्तिक चौधरी व सविता पाल यांच्या शरीरात समुद्राचे पाणी जास्त प्रमाणात गेल्याने व त्यांचा श्वास कोंडल्याने ते मृत पावल्याचे जाहीर केले. मात्र कार्तिकी ही केईएम रुग्णालयात व आर्यन चौधरी हा हिंदुजा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर ओम पाल याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली.
आदित्य ठाकरेंकडून रुग्णालयात भेट व विचारपूस
वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी हिंदुजा रुग्णालयात भेट देऊन तेथे उपचार घेणारे ओम, आर्यन यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच, या मुलांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तेथे उपस्थित माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली.
हेही वाचा – सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचे तुषार गांधींकडून समर्थन, म्हणाले…