पोटनिवडणुकीत माझ्या पक्षासह सर्व पक्ष भाजपला विकले होते

पोटनिवडणुकीत माझ्या पक्षासह सर्व पक्ष भाजपला विकले होते

पालघर लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याच मित्र पक्षांवर खळबळजनक आरोप केला आहे. पालघर पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपला विकले गेल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर त्यांनी हा आरोप केला. आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली, असे ठाकूर यावेळी म्हणाले. यावेळी मित्रपक्षांच्या नेत्यांकडे बोट दाखवत विकले होतात की नाही? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी मित्र पक्षांची मतांची लायकीही हितेंद्र ठाकूरांनी काढली आहे. लायकी जास्त होती तर मते का कमी पडली? असा सवालही त्यांनी केला. आम्हीही त्यावेळी चोर होतो. आमचा अध्यक्ष देखील त्यामध्ये होता. मात्र आता आपण एकत्रित आहोत, असे ते म्हणाले. यावेळी बहुजन विकास आघाडी बरोबर असलेल्या मित्र पक्षाचा चांगलीच गोची झाली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली.

उद्धव ठाकरे इकडे येऊन म्हणतात की आम्ही गुंड आहोत, बाळासाहेब म्हणायचे गुंड चालेल पण षंढ नको. मग मी गुंड आहे, असे ठाकूर यावेळी म्हणाले. यावेळी भाषणाचा शेवट करताना ‘आपले मत शिट्टीला’ असे ठाकूर म्हणाले. यावेळी सभेत हशा पिकला. त्यावेळी कुणी पहिल्या बायकोला आणि पहिल्या प्रेमाला विसरू शकत नाही, असे ठाकूर म्हणाले. यावेळी आपली निशाणी चोरली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

First Published on: April 22, 2019 4:49 AM
Exit mobile version