डोंबिवलीत रिक्षा चालकांची महिलेला मारहाण

डोंबिवलीत रिक्षा चालकांची महिलेला मारहाण

डोंबिवलीत रिक्षाचालकांची महिलेला मारहाण

रिक्षाचालकांच्या उद्दाम वागण्याला अनेकदा प्रवाशांना सामोरे जावे लागते. काही जण या विरोधात तक्रार करतात. तर काही जण दुर्लक्ष करून आपली वाट धरतात. अनेकदा सुट्टे पैसे आणि प्रवासाचे स्थळ यावरून रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये तूतू मैं मैं होते. क्वचित प्रसंगी या तूतू मैं मैं चं पर्यवसान वादात होते. त्यामुळे गंभीर दुर्घटनासुद्धा घडतात. अशीच एक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीत रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात तीन रिक्षाचालकांनी महिलेसह दोन मुलांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी रिक्षा चालकांविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा – माथेफिरुच्या स्टंटबाजीमुळे लोकलचा खोळंबा

गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी

क्षुल्लक कारणावरून तीन गुंडप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी एका महिलेस भररस्त्यात मारहाण केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील इंदिरा चौकात मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी महिलेसह दोन मुलांनाही मारहाण करण्यात आली. रस्त्यातील काही जागरूक नागरिकांनी या प्रकाराबाबत रिक्षाचालकांना जाब विचारला. नागरिकांना संतापलेले पाहून त्या रिक्षाचालकांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी अनोळखी रिक्षा चालकांविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीची तपासणी करून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र शहरात गुंड प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांची दादागिरी वाढली आहे, त्याचा त्रास सामान्य रिक्षाचालकाला होत आहे. त्यामुळे दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

First Published on: August 14, 2019 10:08 PM
Exit mobile version