दिवा, मुंब्रा, कळव्यामधील पूरग्रस्तांनाही मुख्यमंत्र्यांची मदत

दिवा, मुंब्रा, कळव्यामधील पूरग्रस्तांनाही मुख्यमंत्र्यांची मदत

राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या पूरग्रस्त भागातील नागरिकांचे खूप नुकसान झाले. कोल्हापू-सांगलीत तर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील बचावकार्य आणि पुनर्वसनाचे कार्य शासकीय पातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात दिवा, मुंब्रा, कळवा या भागातील नागरिकांनाही पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. या पूरग्रस्तांना अर्थसाहाय्य करण्यात प्रशासनाकडून हयगय होत आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पूरग्रस्तांना ४० हजार रूपयांच्या अर्थसहाय्याची मागणी आव्हाड यांनी केली. आव्हाडांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी येथील पूरग्रस्तांना १५ हजार रूपयांच्या तात्काळ वाटपाचे आदेश दिले.


हेही वाचा – वडापाव विकून पूरग्रस्तांना मदत


प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजारांची मदत

दिवा, मुंब्रा, कळवा आदी भागातील पूरपरिस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अनेकांच्या घरातील एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे येथील उद्ध्वस्त झालेले संसार उभे करावे; पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी योग्य नियोजन करावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, हेमंत टकले, आ. विद्या चव्हाण यांच्यासह आ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिवा, मुंब्रा, कळवा येथील पूरग्रस्तांना तत्काळ अर्थसाह्य देण्याची आग्रही मागणी केली. तसेच, पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ४० हजार रुपये तत्काळ देण्यात यावेत; त्यांच्या बँक खात्यात ते जमा करण्यापेक्षा रोखीने ही रक्कम द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येईल, असे जाहीर केले. तसेच, संबधितांना त्या संदर्भातील आदेशही देण्यात आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

First Published on: August 13, 2019 6:13 PM
Exit mobile version