कर्नल पुरोहितांना दोषमुक्ती नाही; हायकोर्टाने फेटाळली मागणी

कर्नल पुरोहितांना दोषमुक्ती नाही; हायकोर्टाने फेटाळली मागणी

मुंबईः मालेगाव बॉम्बस्फोटातून दोषमुक्त करण्याची कर्नल पुरोहित यांची मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने हा निकाल देत पुरोहित यांची याचिका फेटाळून लावली.

२००८ मध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला. याप्रकरणी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल पुरोहित यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. बॉम्बस्फोटाच्या आरोपातून दोषमुक्त करावे, अशी मागणी करणारा अर्ज पुरोहित यांनी विशेष सत्र न्यायालयात केला होता. विशेष सत्र न्यायालयाने पुरोहित यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर पुरोहित यांनी उच्च न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज केला.

या बॉम्बस्फोटाचा कट अभिनव भारत या संघटनेने रचला होता. या संघटनेने बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. या बैठकांना कर्नल पुरोहित उपस्थित होते, असा आरोप आहे. मात्र कटाची माहिती घेण्यासाठी मी या बैठकांंना हजर होतो. या बैठकांना हजर राहण्याचे आदेश मला माझ्या वरिष्ठांनी दिले होते. हा माझ्या कर्तव्याचाच भाग होता. तसेच मी सैन्यात काम करत होतो. त्यामुळे माझ्यावर आरोप निश्चित करण्यासाठी सैन्य दलाची परवानगी घेणे आवश्यक होते. ती परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे मला याप्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी पुरोहित यांनी याचिकेत केली होती.

न्या. गडकरी यांच्या खंडपीठाने पुरोहित यांचे सर्व दावे फेटाळून लावले. न्यायालय म्हणाले, अभिनव भारत संघटनेच्या बैठकांना हजर राहणे हा तुमच्या कर्तव्याचा भाग होता तर मग बॉम्बस्फोट कसा झाला. तुम्ही तो रोखला का नाहीत. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा बळी गेला तर शेकडो जखमी झाले. मालमत्तेचे नुकसान झाले. हे सर्व पुरोहित यांना रोखता आले असते.

तसेच बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी होणे हा काही पुरोहित यांच्या कामाचा भाग नव्हता किंवा सैन्यातील अधिकारी म्हणून ते त्यांचे कर्तव्यही नव्हते. त्यामुळे पुरोहित यांच्याविरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी सैन्य दलाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले व पुरोहित यांची दोषमुक्तीची मागणी फेटाळून लावली.

 

First Published on: January 2, 2023 7:41 PM
Exit mobile version