शेफच्या सल्ल्याने डी. एस. हायस्कूल बदलणार कॅंटीनमधला मेन्यू !

शेफच्या सल्ल्याने डी. एस. हायस्कूल बदलणार कॅंटीनमधला मेन्यू !

शालेय विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा आणि जीवनशैलीशी निगडीत आजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील २२०० शाळांना मार्गदर्शक तत्वे पाठवली आहेत. त्यानुसार मुलांना फास्टफूड्ससह मैदा, मीठ आणि तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात न देता त्यांना पौष्टिक आहार देणे शाळांमधील कॅटीन्सना बंधनकारक करण्यात येणार आहे. या मार्गदर्शक तत्वांचा उद्देश अत्यंत स्तुत्य असला तरी त्यांची अंमलबजावणी करणे वाटते तितकी सोपी नाही, असं मत सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे.

“शाळेच्या कॅंटीनमध्ये मुलांना पोषक-पौष्टिक खाद्यपदार्थ मिळायला हवेत, याबाबत सर्वांची सहमती आहे. पण हे खाद्यपदार्थ मुलांच्या खिशाला परवडणारे असायला हवेत. त्यामुळे पौष्टिक खाद्यपदार्थ किंमत वाढू न देता ते विद्यार्थ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणं हेच खरं आव्हान आहे”, असं डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, हे आव्हान पेलण्यासाठी डी. एस. हायस्कूलने सेलिब्रिटी शेफ यशोधन देशमुख यांना पाचारण केलं आहे. “मुलांच्या जीभेची आणि खिशाचीही काळजी घेतील असे खाद्यपदार्थ शेफ यशोधन देशमुख सुचवणार असून त्यानुसार नवीन शैक्षणिक वर्षापासून कॅंटीनमधल्या मेन्यूमध्ये योग्य ते बदल करण्यात येईल”, असं राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

गेल्या १० वर्षांपासून डी. एस. हायस्कूलचे कॅंटीन चालवणारे तात्यासाहेब माने यांनी सांगितलं की, “आमच्याकडे वडापाव, उपमा, शिरा, पोहे आणि साबुदाणा खिचडी उपलब्ध असते. पण विद्यार्थ्यांना फक्त वडापावच आवडतो. वडापावची किंमत आज सर्वत्र १२ ते १५ झाली असली तरी आजही आम्ही शाळेतल्या मुलांना १० रुपयात वडापाव देतो. कारण त्यापेक्षा अधिक रक्कम ही शाळकरी मुलं मोजू शकत नाहीत.”

“ शाळेच्या कॅंटीनमध्ये मुलं पालक-शेपू-मेथीसारख्या हिरव्या भाज्या खातील, ही अपेक्षा अवास्तव आहे. मुलांना वडापाव, समोसा, मंच्युरियन, बर्गर हे चटपटीत पदार्थ आवडतात. या चटपटीत पदार्थांनाच कसं पौष्टिक बनवता येईल, त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी वाढवता येईल, याबाबत खरंतर प्राधान्याने विचार व्हायला हवा.”- शेफ यशोधन देशमुख

First Published on: June 2, 2019 3:48 PM
Exit mobile version