रेल्वे प्रवाशाचा प्रमाणिकपणा; रोख रकमेसह बॅग केली परत

रेल्वे प्रवाशाचा प्रमाणिकपणा; रोख रकमेसह बॅग केली परत

रेल्वे प्रवाशाचा प्रमाणिकपणा

डोंबिवली ते सीएसएमटी लोकल प्रवासादरम्यान विसरलेली बॅग एका तरुणाने प्रमाणिकपणे परत केल्याची घटना समोर आली आहे. कुलाबा येथे राहणारे कल्पेश काशिराम पवार (२८) असे बॅग परत करणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

डोंबिवली ते सीएसएमटी लोकल प्रवासा दरम्यान पत्रकार संदीप अंभोरे हे २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आपली महत्वाची कागदपत्रे आणि रोख तीन हजार रुपये असलेली बॅग लोकलमध्येच विसरले होते. मस्जीद बंदर स्टेशवर उतरल्यानंतर लोकलमध्ये बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ लोकल पकडून सीएसएमटी स्टेशन गाठले. उभ्या असलेल्या दोन ते तीन ट्रेनच्या डब्यात शोध घेतला असता बॅग सापडली नाही. अखेर हरवलेल्या बॅगेचा शोध न लागल्यामुळे त्यांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाजवळ बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडे हरवलेल्या बॅगेबाबत तक्रार दाखल करण्यासंबंधी विचारणा केली असता तेथील ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. स्टशेन मास्तर कार्यालयात जाऊन बघा कोणी जमा केली असेल तर मिळेल. अन्यथा काहीही होणार नाही, असे सांगून आपली जबाबदारी झटकली. स्टेशन मास्टरांच्या कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी अशाप्रकारची बॅग कोणीही जमा केली नसल्याचे त्यांना सांगितले गेले. दरम्यान, मंगळवार ३ सप्टेंबर रोजी कल्पेश काशिराम पवार यांनी बॅगेतून मोबाईल क्रमांक शोधून त्यांना बॅग सापडल्याचे सांगून बॅग परत केली. संदीप अंभोरे यांनी रोख रकमेसह कागदपत्रे असलेली बॅग परत मिळाल्यानंतर कल्पेश पवार यांचे आभार मानले आहेत. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांच्या उमर्टपणाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त करीत अशा कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी अंभारे यांनी केली आहे.


हेही वाचा – प्रामाणिक टॅक्सीचालक शेखने परत केले ७ लाखांचे दागिने


First Published on: September 11, 2019 7:03 PM
Exit mobile version