औरंगजेबाच्या समाधीवर नतमस्तक होणारे ओवैसी बंधू महाराष्ट्र द्रोह करतायेत –  प्रविण दरेकर

 औरंगजेबाच्या समाधीवर नतमस्तक होणारे ओवैसी बंधू महाराष्ट्र द्रोह करतायेत –  प्रविण दरेकर

जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न ओवैसी बंधू करत आहेत. त्यांना औरंगजेबी अवलाद मी कालच म्हटलेले आहे. संभाजीराजे यांचा छळ करून त्यांना पत्करावा लागलेला मृत्यू यात औरंगजेबाचे कारस्थान होते. यात छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या समाधीवर जाऊन नतमस्तक होत असतील तर ओवैसी बंधू महाराष्ट्राशी द्रोह करत आहेत, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

औरंगाबादमध्ये गुरूवारी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेऊन फूल वाहिले. त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते म्हणाले की, माझे सरकारला हे विचारणे आहे की जे सरकार राज ठाकरे आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यावर पोपटासारखे पटापटा बोलत असते, कारवाईची भाषा करते, मग आता त्या सरकारचे गृहमंत्री गप्प का आहेत? आता सरकार का बोलत नाही? महाराष्ट्रातील जातीयवादावर बोलणारे नेते आता मूग गिळून का गप्प आहे? हे महाराष्ट्र पाहतो आहे.

औरंगाबाद दौऱ्यात अकबरुद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांसह धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शनही घेतले. तर त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कडवड टिका केली. कुत्रा भुंकतोय, भुंकू दे. सिंहाचे काम डरकाळी फोडणे आहे, त्यामुळे तुम्ही कुणाच्या जाळ्यात अडकू नका, अशा शब्दात ओवेसी यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली.

 

First Published on: May 13, 2022 7:50 PM
Exit mobile version