महावितरणचे थकबाकीदारांविरोधात मेगा ऑपरेशन; ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा केला खंडित

महावितरणचे थकबाकीदारांविरोधात मेगा ऑपरेशन; ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा केला खंडित

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वाढलेली वीजबिलाची थकबाकीमुळे महावितरण आर्थिक संकटातून जात आहे़. विविध माध्यमाद्वारे वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी आपले वीजबिल भरले नाहीत. सध्या, कंपनीची आर्थिक स्तिथी अत्यंत वाईट झाली असून नाईलाजाने महावितरणला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व कार्यालयात वीज बिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे, फेब्रुवारी २०२१ पासून ८०,०५१ थकबाकीदार वीज ग्राहकांचे ११२.१५ कोटी रुपये थकबाकी असून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

यामध्ये, पेण मंडळातील ३५,९३१ ग्राहकांकडे ५५.६९ कोटी थकबाकी, ठाणे मंडळातील १६,९१३ ग्राहकांकडे १६.४२ कोटी रुपये, २७,२०७ ग्राहकांकडे ४०.०३ कोटी थकबाकी असे एकूण ८०,०५१ ग्राहकांकडे ११२.१५ कोटी रुपये थकबाकी असून या ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणच्या भांडूप परिमंडलाने खंडित केला आहे. यापुढे सुद्धा ही मोहीम अजून तीव्र होणार आहे असा इशारा महावितरणतर्फे देण्यात येत आहे.

१००% वसुलीच्या उद्धीष्टाने महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता, सुरेश गणेशकर स्वतः या प्रक्रियेत लक्ष देऊन वेळोवेळी आढावा घेत आहेत. परिमंडल व मंडळ कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वीजबिल वसुलीकरिता रस्त्यावर उतरले आहेत. ३१ मार्च पर्यंत ही मोहीम अजून तीव्र होणार आहे. त्यामुळे, वीजपुरवठा बंद होण्याची गैरसोय टाळण्यासाठी सर्व ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. वीज ग्राहकांच्या सोयीसाठी ऑनलाईन व आर.टी.जी.एस ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, सुट्टीच्या दिवशी ही महावितरणचे सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु असून ग्राहकांना सुट्टीच्या दिवशी भरणा केंद्रात जाऊन आपले वीज बिल भरता येते. यावेळी, भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले, अनधिकृतपणे वीजेचा वापर करू नये ज्यामुळे अपघात होऊन जिवाला धोका असतो. शिवाय अनधिकृतपणे वीज वापर करणे हा एक गुन्हा असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: March 28, 2021 4:24 PM
Exit mobile version