पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्यांच्या विभागातील नागरिकांना पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक पिशव्यांपासून मुक्तता देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ‘ज्यूट बॅग’ यांचे वाटप करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र त्यावरून भाजपचे पालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी रान उठवत विरोध दर्शविला होता. त्यानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी यासंदर्भातील कामाची फाईल नामंजूर केल्याने यशवंत जाधव यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला.
आयुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेच्या विरोधात जाऊन काम करीत असून मुंबईचा विकास नव्हे तर ते मुंबईला भकास करू पाहत असल्याचा आरोप करीत प्रसंगी ज्यूट बॅग वाटपाच्या प्रस्तवाला मंजुरी मिळविण्यासाठी आपण कोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा जाधव यांनी सदर बैठकीतच दिला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमधून मुंबईत पर्यावरणाला घातक प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशा कापडी आणि ज्यूट बॅग यांचा वापर करण्याचा पर्याय पुढे आलेला आहे. त्यानुसारच मी माझ्या विभागातील नागरिकांना ज्यूटच्या बॅग देण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी एक फाईल तयार करून आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवली. मात्र आयुक्तांनी माझी ज्यूट बॅगची फाईल नामंजूर करून पर्यावरण विरोधी कृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्त यांनी मुंबईच्या विकासासाठी कामे करावीत. उगाच नको ती कामे करू नये आणि नको ते सल्ले देऊ नयेत, या शब्दांत यशवंत जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा – भावनिक आवाहन, विनंतीनंतर भाजपकडून ‘त्या’ प्रस्तावांना मंजुरी