… तर १५ ऑक्टोबरनंतर लोकल सुरु होणार?

… तर १५ ऑक्टोबरनंतर लोकल सुरु होणार?

लॉकडाऊनमुळे सुटणाऱ्या नोकऱ्या आणि वाढती रोजगारी यामुळे आता प्रत्येकजण लोकल सुरु करण्याची मागणी करत आहे. त्यातच वकिलांनी उच्च न्यायालायात दाखल केलेली याचिकेत न्यायालयाने सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचे निर्देश दिले असताना ऑक्टोबरच्या १५ तारखेनंतर लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलल्यास लोकल सुरु होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

 
लोकल बंद असल्याने कामावर जाणे शक्य नसल्याने अनेक कंपन्यांमधून मोठया प्रमाणात कामगार कपात करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. परिणामी लवकरात लवकर लोकल सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वकिलांना लोकलमध्ये परवानगी देण्यात यावी यासाठी मुंबईतील काही वकिलांनी मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकल सुरु करता येणे शक्य नसल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र  लोकल सर्वांसाठी सुरु करावी असे, निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यातच मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईमधील लोकल १५ ऑक्टोबरनंतर सुरु करण्याचा विचार सुरु आहे. लोकल सेवा पूर्ण स्वरूपात सुरु न करता काही प्रमाणात सुरु करण्यात विचार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी लोकल २४ तास सुरु करण्याचा विचार आहे. त्यासाठी सरकारी व खासगी कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व बाबी सुरळीत झाल्या तर ऑक्टोबरमध्ये लोकल सुरु झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
First Published on: September 29, 2020 1:35 PM
Exit mobile version