हलगर्जी करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करा

हलगर्जी करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करा

नवी मुंबई महानगरपालिका

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाला असल्याचा ठपका ठेवत परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांनी संबंधित डॉक्टरांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मनपा आयुक्त एन.रामास्वामी यांच्याकडे केली आहे.संबंधित डॉक्टरांवर येत्या तीन दिवसात कारवाई न झाल्यास शुक्रवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सह कुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा इंगळे यांनी दिला आहे.

नवी मुंबई मनपा परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांचा मुलगा विकी इंगळे (27) आजारी असता गत महिन्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे इंगळे यांनी त्याला उपचारासाठी मनपा रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी उपचारादरम्यान त्याला फारसे काही झाले नसल्याचे सांगून प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. उपचार करून घरी आल्यावर छातीतील दुखणे वाढतच गेल्याने पुन्हा रुग्णालयात विकीला दाखल करण्यात आले. मात्र, त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. त्याला वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचा मृत्यू झाला नसता असा आरोप करत त्याच्या मृत्यूला मनपाचे आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप राजेंद्र इंगळे यांनी केला आहे. त्यामुळे विकीच्या उपचारात हलगर्जी केली म्हणून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी राजेंद्र इंगळे यांनी नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार, आयुक्त एन.रामास्वामी व अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे तक्रारी केल्या.

मागील आठवड्यात अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्या नोटिसीपुढे काय?असा सवाल इंगळे यांनी उपस्थित केला.यावेळी आयुक्तांनी आपण ज्यावेळी घटना घडली तेव्हा दिल्लीला असल्याचे सांगत, या प्रकरणातील सर्व पेपर तपासून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन इंगळे यांना दिले आहे.

First Published on: April 16, 2019 4:54 AM
Exit mobile version