कोरोना विषाणूची लाट संपली!

कोरोना विषाणूची लाट संपली!

मागील जवळपास तीन ते साडेतीन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या या लाटेत जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपले प्राण गमावले. संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या. आजही कोरोना संकटाच्या दुष्परिणामांचा जग सामना करत असून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या नुसत्या नावानेच मनाचा थरकाप उडतो, परंतु कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोना म्हणावा तितका जीवघेणा राहिलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही बर्‍यापैकी कमी झाला आहे. त्यामुळेच कोरोनाची लाट संपल्याची मोठी घोषणा जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)कडून शुक्रवारी करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी सांगितले की, गुरुवारी आपत्कालीन समितीची १५वी बैठक झाली. यामध्ये कोविड-१९ ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. तसेच ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले. मागील वर्षभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे शाळेपासून कारखाने बंद होते. या काळात लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या असंख्य समस्या झाल्या. जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असे डब्ल्यूएचओने म्हटले.

आणीबाणी मागे, पण धोका कायम
३० जानेवारी २०२० रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, कारण गेल्या आठवड्यापर्यंत दर मिनिटाला जगात एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू होत होता. तसेच नवीन व्हेरियंटही येत आहेत, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले. कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये १०० पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी एकही मृत्यू झाला नव्हता, मात्र ३ वर्षांनंतर हा आकडा वाढून ७० लाखांपर्यंत पोहचला. सुमारे २० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला, असे डब्ल्यूएचओने सांगितले.

First Published on: May 6, 2023 5:30 AM
Exit mobile version