गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने मुंबईकरांना झोडपून टाकले. वसई- विरार भागात इतका पाऊस कोसळला की, या ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे चार दिवस विरार- वसईची बत्ती गुल करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाणी न ओसरल्याने या ठिकाणी वीज पुरवठा खंडीतच होता. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्नही होताच. पण वसई- विरारकरांची तहान महावितरणणे भागवली आहे ती ही जनरेटरने!
जनरेटरने केला पाणीपुरवठा
वसई- विरारमध्ये पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी ओसरल्यानंतर येथील काही भागात खंडीत वीज सेवा पूर्ववत करण्यात आली. परंतु गुरुवारपर्यंत वसई मधील अश्विन नगर, दिवाणमान, दीनदयाल नगर, साईमंदिर परिसर, नवयुग नगर या परिसरातील महावितरणचे आठ ट्रान्सफॉर्मर पाण्यात होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा पूर्ववत करणे शक्य नव्हते. त्यामुळे १७ सोसायट्यांमधील सुमारे १२०० ग्राहकांचे हाल होत होते. पिण्याचे पाणी ग्राहकांना मिळावे यासाठी या ठिकाणी जनरेटर बसवण्यात आले. जनरेटरच्या मदतीने इमारतींच्या टाक्यांमध्ये पाणी भरता आले.
वाचा- तब्बल ४ दिवसांनी वसई-विरारला पेटले दिवे
३ लाख लोकांची बत्ती गुल
वसई-विरार परिसरात शनिवारपासून सलग चार दिवस कोसळलेल्या पावसामुळे पाणी साचले होते. महापारेषणच्या वसई केंद्रात पाणी शिरल्याने वसई- विरार परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसरातील ३ लाख लोकांच्या घरांची बत्ती गुल करण्यात आली . पावसाचे पाणी ओसरल्यानंतर बुधवारी ,११ जुलै रोजी रात्री ८.३०च्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.