ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट?

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट?

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्यावर्षी पेक्षाही यंदा पाण्याची पातळी घसरली आहे. दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे पाण्याची पातळी अशीच कमी होत राहिली तर पाणीकपात जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांवर पाणीकपातीची टांगती तलवार येऊन ठेपली आहे. ठाणे लघुपाटबंधारे विभागाकडूनच पाण्याचे नियोजन केले जाते त्यानुसारच पाणीकपात जाहीर केली जाते. बारवी धरणात 68.60 मीटर ही ओव्हरफ्लो मर्यादा आहे. सध्या 59.03 मीटर म्हणजेच 99.09 दशलक्षघनीमटर इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातच धरणात 61.10 मीटरपर्यंत पाणीसाठा होता. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 10 टक्के पाण्याची पातळी घटली आहे.

प्रचंड उन्हामुळेच पातळीत घट झाल्याचे संबंधित अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. अडीच महिन्यांपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी घटल्यास पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही एका अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभं राहू शकते. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे तोंडली, मोहघर, आणि संलग्न पाडे, काचकोळी, कोळीवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या सहा गावातील सुमारे 1163 लोकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. जून अखेर धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण होऊन बारवी धरणात 340.86 दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. असेही एका अधिकार्‍याने सांगितले.

First Published on: April 13, 2019 4:25 AM
Exit mobile version