लेखक संपादक शंकरराव किर्लोस्कर

लेखक संपादक शंकरराव किर्लोस्कर

शंकरराव वासुदेव किर्लोस्कर ऊर्फ ‘शंवाकि’ हे मराठी संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते. ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक होते. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे यांचे चुलते होत. शंकरराव किर्लोस्करांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे वडील वासुदेव किर्लोस्कर सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. किर्लोस्कर कुटुंबीयांचे स्नेही असणार्‍या चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकरांमुळे लहानग्या शंकरासही चित्रकलेची गोडी लागली. पुढे त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात दाखला घेतला. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी लाहोरमध्ये श्रीपाद दामोदर सातवळेकरांकडे जाऊन रीतसर चित्रकला शिकायला सुरुवात केली व कालांतराने त्यांना मुंबईच्या सर जे.जे. कला विद्यालयात वरच्या वर्गात प्रवेशही मिळाला.

शिक्षणानंतर ते किर्लोस्करवाडीस आले. तेथे त्यांचे चुलते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापलेल्या किर्लोस्कर कारखान्यात जाहिरातींची सूत्रे ते सांभाळू लागले. उद्योजकांचा वारसा लाभलेल्या किर्लोस्कर या घराण्यात जन्माला येऊन उद्योगाबरोबर साहित्याचा वारसाही तेवढ्याच जोमाने सांभाळणार्‍या शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी विक्रीशास्त्राची पदवी घेतल्यावर आपल्या कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने १९२० साली त्यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते.

१९२९ साली विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले. पुढे किर्लोस्कर मासिकाच्या ‘स्त्री’, ‘मनोहर’ या भावंडांचाही जन्म झाला. त्याचे संपादकही शंकरराव किर्लोस्करच होते. या मासिकांनी रूढी परंपरा, यांवर प्रहार चढवले. महाराष्ट्राच्या नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना एक विशेष प्रतिष्ठा लाभली ती शंकरराव किर्लोस्करांमुळेच. या मासिकांच्या निमित्ताने किर्लोस्करांच्या हातून फार मोठी साहित्यसेवा झाली. साहित्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्यांनी आपला ठसा उमटवला. किर्लोस्कर समूहात विक्री आणि कार्यालयीन व्यवस्थापक आणि प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेतही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे ‘यांत्रिक यात्रा’ हे पुस्तक खूप गाजले. शंकरराव किर्लोस्करांच्या शंवाकिनी या नावाच्या आत्मकथनातून पाच दशकाचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन स्पष्ट होते.

शंकरराव किर्लोस्कर यांनी ‘आत्मप्रभाव’, ‘टाकांच्या फेकी’, ‘यशस्वी धंद्याचा मार्ग’, ‘यांत्रिकाची यात्रा’, ‘व्यापाराचे व्याकरण’, ‘शंवाकिनी’ (आत्मचरित्र) इत्यादी पुस्तके लिहिली. ‘डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ची स्थापना, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे कार्य, ‘कोयना धरण योजने’चा प्रथमपासून पाठपुरावा इत्यादींतून शंकररावांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणास चालना देणारे ठरले. दक्षिण महाराष्ट्रातील साहित्य, रंगभूमी, शिक्षण यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ते स्वतः उत्कृष्ट चित्रकारही होते. किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्त्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. अशा या चतुरस्त्र लेखकाचे 1 जानेवारी 1975 रोजी निधन झाले.

First Published on: October 8, 2021 6:05 AM
Exit mobile version