साडेपाच ते सहा हजार बोटी समुद्रकिनारी विसावल्या

साडेपाच ते सहा हजार बोटी समुद्रकिनारी विसावल्या

पालघर: पालघर जिल्ह्यातील झाईपासून ते वसईपर्यंतच्या 120 किलोमीटर सागरी क्षेत्रातील सुमारे साडेपाच ते सहा हजार बोटी समुद्रकिनारी विसावल्या आहेत. जिल्ह्यात झाईपासून वसईपर्यंत 120 किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. प्रत्येक किनार्‍यावर गावे वसली असून मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. पुढील दोन महिने मासेमारी बंद असल्याने 120 किलोमीटर क्षेत्रातील सुमारे साडेपाच ते सहा हजार मासेमारी बोटी कोळी बांधवांनी किनार्‍यावर लावल्या आहेत. बोटी किनारी लावल्याने मासेमारीच्या साहित्याची जुळवाजुळ करण्याच्या कामाला मच्छीमारांनी वेग धरला आहे. या कालावधीत मासेमारीसाठी जाळी विणणे, मोठी करणे या कामात मच्छीमार व्यग्र असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.

मत्स्य व्यवसाय विभागाकडून एक जून पासून ते एक ऑगस्टपर्यंत मासेमारी कालावधी बंदी जाहीर झाला. हा बंदी कालावधी वाढवून 15 मे ते 15 ऑगस्ट करण्यात यावा या मच्छीमार संस्थांच्या मागणीकडे शासनाने पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीची भावना आहे.पावसाळ्यात मस्त प्रजातीसाठी हा प्रजननाचा काळ असतो. शिवाय वादळी वार्‍याचा धोका असल्याने मासेमारी बंद करण्यात येते. मात्र अलीकडे मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागल्याने मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मत्स्य प्रजननासाठी तीन महिन्याचा कालावधी देण्यात यावा व मासेमारी 15 मे पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात यावी या दृष्टीने त्या समुद्र किनारपट्टीवरील मच्छीमार संस्थानी व संघटनांनी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवावा जेणेकरून मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. या दृष्टीने शासनाकडे मागणी केली होती. मात्र पण शासनाने यावर्षी सुद्धा मच्छीमारांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे पहावयास मिळाले.

First Published on: June 6, 2023 10:08 PM
Exit mobile version