मीरा भाईंदर, वसई -विरार पोलीस दलात मोठे फेरबदल

मीरा भाईंदर, वसई -विरार पोलीस दलात मोठे फेरबदल

वसई : काही दिवसांपूर्वीच मीरा -भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारलेल्या मधुकर पांडेय यांनी तब्बल तेरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करत पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांची विशेष शाखेत रवानगी करण्यात आली असून त्यांच्याजागी तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुळींज पोलीस ठाण्याचा कार्यभार नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. काशिमीर्‍याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची परवाना शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी नियंत्रण कक्षातील संदीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई पोलीस स्टेशनचे कल्याणराव कर्पे यांची अर्नाळा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी परवाना शाखेतील रणजित आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पेल्हार पोलीस ठाण्याचे अमर मराठे यांची अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आर्थिक गुन्हे शाखेचे वसंत लब्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्नाळ्याचे पोलीस निरीक्षक राजू माने यांची नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. उत्तन पोलीस ठाण्याचे प्रशांत लांगी यांची वाहतूक शाखेच्या विरार युनिटच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याजागी वाहतूक शाखा विरार युनिटचे दादाराम कारंडे यांची वर्णी लागली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे देविदास हंडोरे यांच्याकडे वाहतूक शाखेच्या काशिमीरा युनिटच्या पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयात पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी आणि मुंबई शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक सध्या नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

First Published on: January 11, 2023 9:27 PM
Exit mobile version