तीन लग्न समारंभात धाड

तीन लग्न समारंभात धाड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लग्न समारंभात सर्व नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्धार करीत पालघरचे जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरले आहेत. रविवारी रात्री त्यांनी स्वतः लग्न समारंभात धाडी टाकीत तीन लग्न समारंभात नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी स्वतः धाडी टाकून ५० पेक्षा अधिक लोक जमवून धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांविरोधात धाडसत्र सुरु केले आहे. धाडीत तीन लग्नांमध्ये या नियमांचे पालन न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत तीन नवरदेवांच्या पित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस ठाण्याचीही वारी करावी लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खडबळ उडाली.

शिरगाव जलदेवी रिसॉर्ट, सातपाटी आणि उमरोळी बिरवाडी या 3 ठिकाणी लग्न समारंभ होत होते. मात्र, या कार्यक्रमात उपस्थितांची संख्या 50 पेक्षा अधिक असल्याने कारवाई करण्यात आली. तीन नवरदेव पित्यांसह रिसॉर्ट मालक, केटरर्स, डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातपटी आणि बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन व पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना रविवारी रात्री सोबतीला घेऊन थेट 3 लग्नांच्या ठिकाणी धाडी टाकल्या. त्या ठिकाणी 500 हून अधिक लोक आढळून आले.

त्या ठिकाणी अवास्तव गर्दी आणि कोरोना उपाय योजना नियमांचे पालन न केल्याने रिसॉर्ट मालक, केटरर्स, डीजे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर तीनही नवरदेवांच्या पित्यांना ताब्यात घेण्यात आले. सातपाटी व बोईसर पोलीस ठाण्यात नवरदेवाच्या 3 पित्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: February 22, 2021 9:53 PM
Exit mobile version