ग्रामीण, आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच

ग्रामीण, आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला पर्याय म्हणून शाळांनी ऑनलाइन शिक्षण हे माध्यम निवडले. मात्र ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईल सुविधेचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील ऑनलाइन शिक्षणाचा बट्ट्याबोळ उडाला होता. आता पुन्हा तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेवून सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद केल्या आणि ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा पुन्हा एकदा सुरु झाला आहे. यामुळे पालक मात्र चिंतेत पडले आहेत. त्यातच आदिवासी आणि इतर मोलमजुरी करणार्‍या पालक इंटरनेट सुविधेपासून कोसो दूर असल्याने हे विद्यार्थी देखील ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.
महाड तालुक्यात एकूण ३०८ प्राथमिक शाळा आहेत. यातील ठराविक शाळा या इंटरनेट च्या आसपास आहेत. तर बहुतांश शाळा या ग्रामीण आणि दुर्गम खेडोपाड्यात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा अचानक वाढल्याने सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद केल्या आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा कात्रीत सापडला. तालुक्यात बहुतांश भागात इंटरनेट नसल्याने तयार झालेल्या १५० हून अधिक डिजिटल शाळांमधील डिजिटल यंत्रणा बिनकामाच्या ठरत आहेत. गावात इंटरनेटच नाही तर मोबाईलवर तरी शिक्षण कसे मिळणार असा प्रश्न पालकांपुढे पडला आहे. महाड शहरालगत असलेली गावे, औद्योगिक क्षेत्रात असलेली गावे वगळता डोंगर दर्‍यात वसलेल्या गावात कोठून येणार इंटरनेट. ग्रामीण भागातील बहुतांश पालक हे शेतकरी, मजुरी करणारे आहेत. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेले अनेक कष्टकरी, शेतकरी आजही मोबाईल पासून वंचित आहेत. प्राथमिक शिक्षण हा त्यांचा आधार असला तरी कोरोनाने ग्रामीण भागातील शिक्षण देखील ठप्प केले आहे.
ज्या भागात मोबाईल मनोरे आहेत त्या भागातील वीज गेल्यास मोबाईलची रेंज देखील गायब होते. कायम ठप्प होणार्‍या इंटरनेटमुळे डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण कुचकामी ठरत आहे. ग्रामीण भागातील मुलांना मोबाईल किंवा संगणक घेणे परवडणारे नसल्याने अशी हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून आजही दूरच आहेत. बालभारतीच्या माध्यमातून ऑनलाइन पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असली तरी ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत त्या विद्यार्थ्यांना या डिजीटल पुस्तकांचा काहीच फायदा नाही. हीच अवस्था शहरात देखील आहे.
शहरात देखील अनेक वेळा इंटरनेट गायब होत असल्याने शिक्षक मोबाईलवर झूम, गुगल मिट अशा सोशल साईडच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असले तरी अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होवून शिक्षक आणि मुलांमधील संपर्क तुटला जातो. तर दुसरीकडे या तांत्रिक अडचणीमुळे आवाज येत नाही अशी तक्रार समोरून विद्यार्थी करतात तर अनेकवेळा शिक्षक किंवा शिक्षिका दिसत नाहीत, आवाज येत नाही अशी तक्रार देखील मुलांकडून होत आहे. गेली दोन वर्ष शिक्षणाचा हा बट्ट्याबोळ अजून किती वर्ष सुरु राहणार असा प्रश्न पालक विचारू लागले आहेत.ग्रामीण भागातील आदिवासी, घनगर, आदी गोरगरीब पालक मोबाईलपासून वंचित असल्याने आणि वाडी वस्त्यांवर मोबाईलची रेंज नसल्याने इंटरनेट नाही. यामुळे बहुतांश आदिवासीवाडीवरील विद्यार्थी आजही या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आदिवासींना या आधुनिक शिक्षण पद्धतीचा अद्याप थांगपत्ता देखील लागलेला नाही. प्राथमिक शिक्षक देखील कोरोना महामारीचा काळ असल्याने वाडीवस्त्यांवर जात नाहीत. यामुळे अनेक आदिवासी वाडीवरील मुले यावर्षी या डिजिटल शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.

First Published on: January 12, 2022 8:39 PM
Exit mobile version