क्रिकेट संघातील खळबळजनक गौप्यस्फोटानंतर चेतन शर्मांचा बीसीसीआयमधील पदाचा राजीनामा

क्रिकेट संघातील खळबळजनक गौप्यस्फोटानंतर चेतन शर्मांचा बीसीसीआयमधील पदाचा राजीनामा

स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेट संघाचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी भारतीय संघ आणि खेळाडूंशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यानंतर ते वादात सापडले. ज्यामुळे आता त्यांनी बीसीसीआयमधील निवड समितीमधील अध्यक्ष पदाचा राजीनामा बीसीसीआय अध्यक्ष जय शहा यांच्याकडे सोपवला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. 7 जानेवारी 2023 रोजी त्यांची दुसऱ्यांदा भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तब्बल महिनाभरानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ते दोन वेळा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड अध्यक्ष पदी नियुक्त झाले होते, परंतु दोन्ही वेळा ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.

चेतन शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या नात्यापासून ते खेळाडू घेत असलेल्या इंजेक्शनपर्यंत अनेक बाबींवर गंभीर खुलासे केले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा म्हणाले होते की, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंची शारीरिक अवस्था जेव्हा 80 टक्के चांगले असते तेव्हा ते इंजेक्शन घेऊन शारीरिक अवस्था 100 टक्के चांगली करतात. हे इंजेक्शन वेदनाशामक म्हणून वापरण्यात येत नाही. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप चाचणीत आढळत नाहीत. बनावट फिटनेससाठी इंजेक्शन घेणाऱ्या या सर्व खेळाडूंकडे बाहेरचे डॉक्टरही असतात.

चेतन शर्माने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेतील स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बुमराहच्या पुनरागमनावरून त्याच्यात आणि संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याचा आरोपही केला आहे. बुमराह अजूनही खेळत नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत देखील त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही तो खेळताना दिसणार नाही.

माजी कर्णधार कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचेही चेतन शर्माकडून यावेळी सांगण्यात आले. कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर बोलताना चेतन म्हणाले होते की, कोहलीला वाटत होते की सौरव गांगुलीमुळे कर्णधारपद गमवावे लागले, पण तसे नाही. निवड समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बरेच लोक होते. याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला त्यावेळी गांगुली यांच्याकडून कोहलीला देण्यात आला होता.

यावेळी चेतन शर्मा यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. ज्यामुळे आता बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. बोर्डाशी करार असताना, कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नाही. चेतनने त्याचे उल्लंघन केले असल्याने आता या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

यापूर्वीही वादात सापडले होते चेतन शर्मा
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत हरला आणि निवड समितीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, यावर्षी त्यांची मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

शर्मा यांच्या व्यतिरिक्त, शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नवीन वरिष्ठ निवड समितीचे इतर चार सदस्य आहेत. चेतनच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याचे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. दरम्यान, भारतीय निवड समिती बरखास्त केल्यानंतर निवड समितीवर नवे सदस्य निवडले जातील, अशी अपेक्षा होती, मात्र जुन्या निवड समितीच्या अध्यक्षांची दुसऱ्यांदा निवड झाल्याने वाद निर्माण झाला होता.

हेही वाचा – “विरोधकांची वेळकाढूपणाची भूमिका”; सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

First Published on: February 17, 2023 1:27 PM
Exit mobile version