२०२० वर्ष आयपीएलविना संपावे असे वाटत नाही – गांगुली

२०२० वर्ष आयपीएलविना संपावे असे वाटत नाही – गांगुली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. या स्पर्धेला २९ मार्चला सुरुवात होणार होती. परंतु, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने बीसीसीआयला आयपीएल स्थगित करणे भाग पडले. सध्या सर्वप्रकारचे क्रिकेट बंद असल्याने बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच आयपीएल न होऊ शकल्यास बीसीसीआयला अधिक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकेल. त्यामुळे २०२० वर्ष आयपीएल स्पर्धा झाल्याशिवाय संपावे असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला वाटत नाही.

स्पर्धा कुठे होईल हे सांगणे अवघड

आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. २०२० वर्ष आयपीएल स्पर्धा झाल्याशिवाय संपावे असे आम्हाला वाटत नाही. आयपीएल भारतात आयोजित करण्याला आम्ही प्राधान्य देऊ. अवघे ३५-४० दिवस मिळाले तरीही आम्ही आयपीएल स्पर्धा आयोजित करू. मात्र, ही स्पर्धा कुठे होईल हे आताच सांगणे अवघड आहे, असे गांगुली एका मुलाखतीत म्हणाला.

स्पर्धा परदेशात झाल्यास खर्च वाढेल

यंदा आयपीएल व्हावे अशी इच्छा असली तरी, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबाबत आयसीसी अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत आयपीएलबाबत निर्णय घेणे अशक्य असल्याचे गांगुलीने स्पष्ट केले. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदा ही स्पर्धा परदेशात घ्यावी लागू शकेल. न्यूझीलंड, श्रीलंका आणि युएई या देशांनी आयपीएलच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. मात्र, ही स्पर्धा परदेशात झाल्यास खर्च वाढेल असे गांगुलीला वाटते.

ठराविक दिवसच उपलब्ध

आम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. सर्वात आधी म्हणजे आयपीएलसाठी ठराविक दिवसच उपलब्ध असतात. त्या वेळातच आम्हाला ही स्पर्धा घ्यावी लागेल. दुसरे म्हणजे आम्हाला ही स्पर्धा भारतातच घ्यायची आहे. ते शक्य न झाल्यास आम्ही परदेशात या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करू. मात्र, परदेशात ही स्पर्धा घ्यायची म्हणजे खर्च वाढणार, केवळ बोर्डासाठीच नाही, तर संघांसाठीही, असे गांगुलीने नमूद केले.

First Published on: July 9, 2020 2:00 AM
Exit mobile version