गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली – राजपूत 

गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली – राजपूत 

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात कर्णधार म्हणून बरेच साम्य होते. गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली, तर धोनीने भारतीय क्रिकेटला आणखी पुढे नेले, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक आणि व्यवस्थापक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. राजपूत यांनी या विश्वविजेत्या संघाच्या व्यवस्थापकाची भूमिका बजावली होती. गांगुलीप्रमाणेच धोनीही युवा खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचा असे राजपूत यांनी सांगितले.

धोनीने भारतीय क्रिकेटला आणखी पुढे नेले

गांगुली त्याच्या खेळाडूंना खूप पाठिंबा द्यायचा. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढायचा. गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली आणि धोनीने भारतीय क्रिकेटला आणखी पुढे नेले. एखाद्या खेळाडूमध्ये खूप प्रतिभा आहे असे धोनीला वाटल्यास तो त्या खेळाडूला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी द्यायचा, असे राजपूत म्हणाले.

गांगुली खूपच आक्रमक

धोनी खूपच शांत आणि संयमी होता. तो इतर खेळाडूंपेक्षा पुढचा विचार करायचा. कर्णधाराला मैदानात जाऊन निर्णय घ्यावे लागतात. तो सतत विचार करत असायचा आणि त्याची हीच गोष्ट मला खूप आवडायची. तो कर्णधार म्हणून गांगुली आणि राहुल द्रविड यांचे मिश्रण होता असे म्हणता येईल. गांगुली खूपच आक्रमक होता आणि सकारात्मक विचार करायचा. दुसरीकडे द्रविड शांत होता, पण तोसुद्धा खूप विचार करायचा, असेही राजपूत यांनी सांगितले. धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असून त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले.

First Published on: June 30, 2020 1:30 AM
Exit mobile version