भारताच्या पराभवाला अश्विनच जबाबदार – हरभजन सिंह

भारताच्या पराभवाला अश्विनच जबाबदार – हरभजन सिंह

हरभजन सिंग विरूद्ध आर. अश्विन

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत चौथ्या कसोटीतील पराभवामुळे भारताच्या हातातून मालिका निसटली आहे. या पराभवाबद्दल सर्वत्रच चर्चा असून कर्णधार, प्रशिक्षक अशा बऱ्याच जणांवर आतापर्यंत या पराभवाचे खापर फोडले जात आहे. मात्र आता फिरकीपटू हरभजनने पराभवाला कारण हा गोलदांज अश्विन असल्याचे सांगितले आहे. हरभजनने हे वक्तव्य इंडिया टूडे या चॅनेलशी बोलताना दिले आहे.

काय म्हटला हरभजन?

हरभजन स्वत: एक ऑफस्पिनर असून त्याच्या मते ज्या मैदानावर चौथी टेस्ट झाली ते साऊदम्टनचे मैदान हे ऑफस्पिनर गोलंदाजांसाठी फायद्याचे आहे. योग्य ठिकाणी बॉल टाकल्यास ऑफस्पिनरला विकेट्स मिळू शकतात. मात्र अश्विनला याचा फायदा उचलता आला नसल्याने भारताला पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडचा मोईन अली एक ऑफस्पिनर असून त्याने तब्बल ९ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अश्विनला केवळ ३ विकेट्स घेण्यातच यश आल्याने हरभजनने ही टीका केली आहे.

हरभजन सिंग

आणि भारताने मालिका गमावली…

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने ३१ धावांनी विजय मिळवला त्या पाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडने तब्बल १५९ धावांनी विजय मिळवल्यानंतर इंग्लंड मालिका जिंकतो असे वाटत असताना भारताने मालिकेत कमबॅक करत तिसरी कसोटी तब्बल २०३ धावांनी जिंकली. मात्र चौथ्या कसोटीत भारताच्या पुजारा आणि कोहली यांना वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नसल्याने भारताला ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत ३-१ ची आघाडी घेतल्याने भारताच्या हातातून मालिका गेली आहे.

First Published on: September 6, 2018 4:51 PM
Exit mobile version