मी गौतम गंभीरची कारकीर्द संपवली!

मी गौतम गंभीरची कारकीर्द संपवली!

गौतम गंभीर (सौजन्य- जनसत्ता)

२०१२ सालच्या मालिकेत माझ्याविरुद्ध खेळण्यात अडचण आल्यामुळे गौतम गंभीरची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आली, असा दावा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने केला आहे. ७ फूट १ इंच उंची असणारा इरफान क्रिकेट इतिहासातील सर्वात उंच गोलंदाजांपैकी एक आहे. २०१२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मर्यादित षटकांच्या (टी-२० आणि एकदिवसीय) मालिकेत इरफानने गंभीरला चार वेळा बाद केले होते. यानंतर गंभीर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ एक मालिका खेळू शकला.

मी जेव्हा भारताविरुद्ध खेळलो, तेव्हा त्यांच्या फलंदाजांना अडचणीत टाकत होतो. २०१२ साली झालेल्या मालिकेत माझ्या चेंडूचा टप्पा कोठे पडणार हे त्यांना फारसे कळत नव्हते आणि त्यांना माझ्या चेंडूचा वेगही समजण्यात अडचण येत होती. हे भारताच्याच काही खेळाडूंनी मला सांगितले होते. खासकरून गंभीरला माझ्याविरुद्ध खेळताना अडचण येत होती. दोन्ही संघांचे खेळाडू नेट्समध्ये सराव करताना तो माझ्याकडे बघायचाही नाही. २०१२ सालच्या मालिकेत मी त्याला चार वेळा बाद केले होते. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास कमी झाला. मी गंभीरची कारकीर्द संपवली असे म्हणत काही लोकांनी माझे अभिनंदन केले होते, असे इरफान म्हणाला.

कोहलीला माझ्या गोलंदाजीचा वेग कळला नाही!

भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, त्यालाही माझ्या गोलंदाजीचा वेग कळला नाही, असे मोहम्मद इरफानने सांगितले. कोहलीला वाटले होते की, मी १३०-१३५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करत असेन. मात्र, मी वेग वाढवला होता आणि १४५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करत होतो. त्यामुळे मी कोहलीला अडचणीत टाकले होते.

First Published on: October 8, 2019 5:32 AM
Exit mobile version