माझ्यासोबत येणाऱ्या खेळाडूला एक तरी सामना खेळायला मिळायचाच; भारत ‘अ’ संघाबाबत द्रविडचे वक्तव्य

माझ्यासोबत येणाऱ्या खेळाडूला एक तरी सामना खेळायला मिळायचाच; भारत ‘अ’ संघाबाबत द्रविडचे वक्तव्य

 

भारतीय क्रिकेट संघाची मजबूत राखीव फळी तयार करण्याचे श्रेय हे अनेकदा भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविडला दिले जाते. द्रविडने २०१६ ते २०१६ या कालावधीत भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे आणि भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्याच्या मार्गदर्शनात खेळलेले बरेचसे क्रिकेटपटू आता भारताच्या सिनियर संघाकडून खेळत आहेत. भारत ‘अ’ संघाला प्रशिक्षण देताना सर्व खेळाडूंना संधी देण्याचा माझा प्रयत्न असायचा, असे द्रविड म्हणाला. द्रविड आगामी श्रीलंका दौऱ्यात भारताचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे.

अनुभवांतून काही गोष्टी शिकलो

तुम्ही माझ्यासोबत भारत ‘अ’ संघाच्या दौऱ्यावर आलात, तर मी तुम्हाला एकही सामना न खेळता परत येऊ देणार नाही, असे मी खेळाडूंना आधीच सांगायचो. माझा सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न असायचा. मी मला आलेल्या अनुभवांतून काही गोष्टी शिकलो. लहानपणी क्रिकेटपटू म्हणून एखाद्या ‘अ’ संघाच्या दौऱ्यावर गेल्यानंतर एकही सामना खेळायला न मिळणे हे फार निराश करणारे असायचे, असे द्रविडने सांगितले.

निवड समितीसुद्धा नव्याने विचार करू लागते

तुम्ही स्थानिक क्रिकेटमध्ये ७००-८०० धावा केल्यावर तुमची ‘अ’ संघात निवड होते. त्यानंतर तुम्हाला स्वतःमधील क्षमता दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे. अन्यथा निवड समितीसुद्धा पुन्हा तुमचा नव्याने विचार करू लागते. तुम्हाला पुन्हा स्थानिक क्रिकेटमध्ये ८०० धावा कराव्या लागतात. खेळाडूंच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही, असे द्रविड म्हणाला.

First Published on: June 11, 2021 9:58 PM
Exit mobile version