कटकमध्ये आम्ही उत्कृष्ट खेळू -पोलार्ड

कटकमध्ये आम्ही उत्कृष्ट खेळू -पोलार्ड

किरॉन पोलार्डचे मत

रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकांमुळे भारताविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ पराभूत झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीत ३८७ धावा केल्या. विंडीजच्या गोलंदाजांनी पहिल्या ४० षटकांत भारतीय फलंदाजांना वेगाने धावा करू दिल्या नाहीत.

मात्र, अखेरच्या अखेरच्या १० षटकांत त्यांनी १२७ धावा खर्ची केल्या. या १० षटकांमुळेच आम्ही हा सामना गमावला, असे विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्ड म्हणाला. तसेच रविवारी कटक येथे होणार्‍या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा संघ उत्कृष्ट खेळ करेल असा पोलार्डला विश्वास आहे.

आम्ही गोलंदाजीत अखेरच्या १० षटकांत १२७ धावा खर्ची केल्या आणि तिथेच आम्ही हा सामना गमावला. त्याआधी दोन संघांमध्ये फारसा फरक नव्हता. आम्ही अखेरच्या षटकांत योजनेप्रमाणे गोलंदाजी करु शकलो नाही. तसेच फलंदाजीत आम्ही ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र, आम्ही या सामन्यातही भारताला झुंज दिली याचा अभिमान आहे.

आम्ही पुढील सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरू. आमची नक्की काय योजना असेल हे मी सांगत नाही. परंतु, दुसर्‍या सामन्यात ज्या चुका केल्या, त्या पुढील सामन्यात न करण्याचा प्रयत्न करू. आम्ही या निर्णायक सामन्यात उत्कृष्ट खेळ करू याची मला खात्री आहे, असे पोलार्ड म्हणाला.

First Published on: December 20, 2019 5:25 AM
Exit mobile version