भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबदबा राहिला. पण असे असतानाही चेतेश्वर पुजाराने अप्रतिम फलंदाजी करत शतकी खेळी केली. त्याचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाजांनी निराशाच केली. भारताचे बरेचसे फलंदाज हे खराब फटका मारून बाद झाले. त्यामुळे इतर फलंदाजांनी अधिक संयमाने खेळ करायला हवा होता असे चेतेश्वर पुजारा म्हणाला.
फलंदाज चुका दुरुस्त करतील
पुजारा फलंदाजांविषयी म्हणाला, “पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलीच पण आमच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असल्याने मला संयम राखायचा आहे आणि माझ्या पट्ट्यात येणाऱ्या चेंडूची वाट पहायची आहे हे मी मनाशी ठरवले होते. इतरांनीही तेच करायची गरज आहे. पण ते त्यांच्या चुकीतून शिकतील आणि दुसऱ्या डावात अधिक चांगली फलंदाजी करतील अशी मला आशा आहे. माझ्या खेळीविषयी म्हणायचे तर मी या मालिकेआधी चांगला सराव केला होता. तसेच मला कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्याचा मला आज फायदा झाला.”