IND vs ENG : भारताची विजयाची हॅटट्रिक; चौथ्या कसोटीत डावाने विजय  

IND vs ENG : भारताची विजयाची हॅटट्रिक; चौथ्या कसोटीत डावाने विजय  

अक्षर पटेल

रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या उत्कृष्ट फिरकीपुढे पुन्हा इंग्लंडने नांगी टाकली. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १३५ धावांत आटोपल्याने भारताने चौथा कसोटी सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने चार सामन्यांची ही मालिका ३-१ अशी जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या आणि याचे उत्तर देताना भारताने ३६५ धावा करत पहिल्या डावात १६० धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १३५ धावांतच आटोपल्याने भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अक्षर आणि अश्विनने ५-५ गडी बाद केले.

सुंदरचे शतक हुकले 

इंग्लंडच्या २०५ धावांचे उत्तर भारताने पहिल्या डावात ३६५ धावांची मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडला होता. परंतु, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पंतने ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली आणि हे त्याचे भारतातील पहिलेच शतक ठरले. सुंदरनेही अप्रतिम फलंदाजी केली. मात्र, त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. तो १७४ चेंडूत ९६ धावांवर नाबाद राहिला. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवली होती.

First Published on: March 6, 2021 4:00 PM
Exit mobile version