भारताची सायप्रसमध्ये होणार्‍या नेमबाजी वर्ल्डकपमधून माघार

भारताची सायप्रसमध्ये होणार्‍या नेमबाजी वर्ल्डकपमधून माघार

करोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारोंनी आपले प्राण गमावले. या विषाणूची सर्वात आधी लागण चीनमधील नागरिकांना झाली होती. मात्र, आता विविध देशांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहे. करोनाचा परिणाम खेळांवरही झाला आहे. करोनाच्या धोक्यामुळे जगभरातील विविध स्पर्धा रद्द झाल्या आहेत. करोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तरच टोकियो ऑलिम्पिक होणार असे म्हटले जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर भारताने सायप्रसमध्ये पुढील महिन्यात होणार्‍या नेमबाजी विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाची (आयएसएसएफ) मान्यता असलेला शॉटगन विश्वचषक ४ ते १३ मार्च या कालावधीत सायप्रसमधील निकोसियामध्ये होणार आहे. मात्र, या स्पर्धेत भारत सहभागी होणार नाही. करोना विषाणूच्या धोक्यामुळे आम्ही या स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि आम्हाला तसे करण्याचा सल्ला केंद्रीय प्रशासनाकडून मिळाला आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा योग्य निर्णय आहे. आम्ही नेमबाज, प्रशिक्षक आणि अधिकार्‍यांचे आरोग्य धोक्यात टाकू शकत नाही, असे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनमधील (एनआरएआय) सूत्रांकडून सांगण्यात आले.

First Published on: February 29, 2020 3:46 AM
Exit mobile version