IPL 2021 : बीसीसीआयची चिंता वाढली! खेळाडूंनंतर आता दोन पंचांची माघार

IPL 2021 : बीसीसीआयची चिंता वाढली! खेळाडूंनंतर आता दोन पंचांची माघार

भारताचे पंच नितीन मेनन

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आयोजनावरून बीसीसीआयच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा धोका लक्षात घेऊन काही खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली होती. या खेळाडूंपाठोपाठ आता दोन पंचांनी आयपीएल स्पर्धा मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे आघाडीचे पंच नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफल यांनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातल्याने पॉल रायफल यांना मायदेशी परतण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता रायफल आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.

कुटुंबियांना कोरोनाची बाधा

नितीन मेनन हे आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये असणारे एकमेव भारतीय पंच आहेत. आयपीएलच्या आधी झालेल्या भारत आणि इंग्लंड मालिकेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांचे सर्वत्र कौतुकही झाले होते. परंतु, त्यांच्या पत्नी आणि आईला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी म्हणून मेनन यांनी आयपीएलमधून माघार घेत घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

माघार घेणारे मेनन हे दुसरे भारतीय

‘मेनन यांनी आयपीएलमधून माघार घेतल्याचे वृत्त खरे आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याने ते पंच म्हणून काम करण्याच्या मनस्थितीत नाहीत,’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यंदाच्या आयपीएलमधून माघार घेणारे मेनन हे दुसरे भारतीय आहेत. याआधी भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननेही आयपीएलमधून माघार घेतली होती. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता.

First Published on: April 29, 2021 4:03 PM
Exit mobile version