दिग्गज क्रिकेटपटू आणि भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी हार्दिक पांड्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर हार्दिक संघाच्या मागणीनुसार गोलंदाजी करत नसेल तर त्याला ऑसराउंडर खेळाडू म्हणायचे का, असा प्रश्न कपिल देव यांनी विचारला आहे. हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी करत नाही आहे. तो दुखापतीतून सावरल्यानंतर देखील हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकातही तो खेळला होता त्यामध्ये त्याने फक्त दोन सामन्यात तुरळक प्रमाणात गोलंदाजी केली होती. ऑलराउंडरच्या रूपात संघात समाविष्ट असलेल्या हार्दिककडून निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली होती.
विश्वचषकात केलेल्या खराब कामगिरीमुळे पांड्याला न्यूझीलंडविरूध्दच्या घरच्या टी-२० मालिकेतूनही वगळण्यात आले होते. या बाबींकडे लक्ष वेधत कपिल यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाष्य केले की, ‘ऑलराउंडर म्हणायचे असेल तर त्याला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. तो गोलंदाजी करत नाही तर आपण त्याला ऑलराउंडर म्हणू शकतो का? त्याला गोलंदाजी करू द्या तो नुकताच दुखापतीतून ठिक झाला आहे. अशा शब्दांत कपिल यांनी पांड्याच्या गोलंदाजीवर प्रश्व उपस्थित केला.
मात्र माजी ऑलराउंडर खेळाडूने हार्दिक देशासाठी महत्त्वाचा फलंदाज असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘तो देशासाठी महत्त्वाचा फलंदाज आहे. गोलंदाजी करण्यासाठी त्याला अधिक सामने खेळावे लागतील. प्रभावित करून गोलंदाजी करावी लागेल आणि मगच आपण त्याच्यावर अधिक भाष्य करू शकतो.