मला कर्णधार पदावरुन हटवण्यात एकटे चॅपेल दोषी नाहीत; गांगुलीचा खुलासा

मला कर्णधार पदावरुन हटवण्यात एकटे चॅपेल दोषी नाहीत; गांगुलीचा खुलासा

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने क्रिकेटला अविदा करुन बरिच वर्षे लोटली आहेत. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष असा स्वप्नवत प्रवास सौरव गांगुलीने पूर्ण केला आहे. पण आता त्याने त्याच्या सर्वात कठीण काळाचा खुलासा केला आहे. गांगुली भारतीय संघाचा कर्णधार असताना प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि त्यांच्यातले मतभेद जगजाहीर आहेत. गांगुलीला कर्णधारपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आली. यामागे ग्रेग चॅपेल यांचाच हात होता अशी समज आजपर्यंत सर्वांना होती. मात्र, या सगळ्याचा गांगुलीने उलगडा केला आहे.

एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने खुलासा केला. “माझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा धक्का होता. कर्णधारपद काढून घेणं हा माझ्यावरचा अन्याय होता. प्रत्येक वेळी तुम्हाला न्याय मिळेल अशी मलाही अपेक्षा नव्हती, पण ज्या पद्धतीने मला वागणूक देण्यात आली ते टाळता आलं असतं. त्यावेळी मी संघाचा कर्णधार होतो, तेव्हा आम्ही झिम्बाब्वे दौरा जिंकून आलो होतो आणि अचानक मला कर्णधारपदावरुन काढण्यात आलं. भारतासाठी २००७ सालचा विश्वचषक जिंकण्याचं माझं स्वप्न होतं. २००३ मध्ये आम्ही अंतिम फेरीत हरलो होतो. स्वप्न पाहण्याचा मलाही अधिकार होता. माझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ वर्ष घरच्या मैदानावर आणि परदेशात चांगली कामगिरी करत होता. असं असताना अचानक मला संघातून काढलं जातं? पहिल्यांदा सांगण्यात आलं की मी वन-डे संघाचा सदस्य नाहीये…त्यानंतर कसोटी संघातूनही मला डावलण्यात आलं. हे सर्व त्यावेळेचे प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि बीसीसीआय यांच्यातले इ-मेल लिक झाल्यानंतरच या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली,” असं गांगुली म्हणाला.

“मला एकट्या ग्रेग चॅपल यांना दोषी धरायचं नाहीये. त्यांनी या सर्व प्रकरणाला सुरुवात केली यामध्ये शंकाच नाही. माझ्याविरोधात त्यांनी अचानक बोर्डाला इ-मेल पाठवला. क्रिकेट संघ हा एका परिवारासारखा असतो. अनेकांची वेगळी मतं असणारच, चर्चेने त्यावर मार्ग काढता येतात. तुम्ही संघाचे प्रशिक्षक आहात, तुम्हाला वाटत असेल की माझा खेळ बरोबर होत नाहीये, मी वेगळ्या पद्धतीने खेळायला हवं तर तुम्ही मला तसं येऊन सांगणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून मी संघात पुनरागमन केलं तेव्हा चॅपेल मला या गोष्ट सांगायचे, मग कर्णधार असताना त्यांनी असं का केलं नाही?” असं सौरव गांगुली म्हणाला.


हेही वाचा – जेव्हा सचिनने गांगुलीला दिली होती करिअर संपवण्याची धमकी


यामध्ये चॅपेल जितके दोषी आहेत तितकेच इतरही. एक परदेशी प्रशिक्षक भारतीय संघाच्या निवडीबद्दल एवढी महत्वाची भूमिका बजावू शकत नाही. संपूर्ण यंत्रणा माझ्याविरोधात होती. त्यामुळेच हे शक्य झालं. मला कर्णधारपदावरुन हटवण्यात सर्वांचा सहभाग होता. पण या काळात मी खचलो नाही. स्वतःवरचा विश्वासही मी कमी होऊ दिला नाही. सौरव गांगुलीने जुन्या कटू आठवणी जागवल्या. २००५ साली भारतीय संघातून स्थान गमावल्यानंतर गांगुलीने २००६ साली संघात पुन्हा पुनरागमन केलं. त्यानंतर दोन वर्षांनी २००८ साली गांगुली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटी सामन्याद नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.


हेही वाचा – कोरोना महामारीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं चुकीचं – राहुल गांधी


 

First Published on: July 10, 2020 6:27 PM
Exit mobile version