बारबाला, बाटलीच्या नादी लागून व्यापारी बनला चोर

बारबाला, बाटलीच्या नादी लागून व्यापारी बनला चोर

थेट शेतकर्‍याकडून माल उचलून कल्याण बाजारात विकणारा व्यापारी बारबाला आणि बाटलीच्या नादी लागून चोर बनल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यापार्‍याने कल्याण डोंबिवली परिसरात मागील काही महिन्यात ४ ठिकाणी घरफोडी करून चोरीचा पैसा बारबालेवर उडवल्याची माहिती त्याच्या चौकशीत समोर आली आहे.

बबन जाधव असे या व्यापार्‍याचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका खेड्यात आपल्या कुटुंबासह राहण्यास होता. लॉकडाऊनच्या काळात बबन जाधव हा इगतपुरी, घोटी आदी परिसरातील शेतकर्‍याकडून भाजीपाला घेऊन कल्याणच्या घाऊक बाजारात विक्रीसाठी येत होता. दररोज चार ते पाच हजार रुपयांची विक्री करून घरी जाणारा बबन हा मित्रांच्या नादी लागून बियरबारमध्ये जाऊ लागला होता.

हळूहळू त्याला बियरबारचा चांगलाच नाद लागला आणि तो भाजीपाला विक्रीतून मिळालेले पैसे बारबालावर उडवू लागला होता. दोन दोन दिवस कल्याणमध्ये मुक्काम ठोकून तिसर्‍या दिवशी रिकाम्या हाताने घरी परतणारा बबन जाधव हा पत्नीला धंदा झाला नाही, महानगपालिकेने माल उचलून नेला अशी कारणे सांगू लागला होता. घरी पैसे येणे बंद झाल्यामुळे पत्नी आणि मुलांची उपासमार सुरू झाली होती.

त्यात बबन हा शेतकर्‍याकडून उधारीवर भाजीपाला घेऊन कल्याणच्या बाजारात विकू लागला आणि तेच पैसे दारू आणि बारबालेवर उडवू लागला. बियर बारवर उडवण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे अखेर बबनने चोरीचा मार्ग पत्करला. कल्याण डोंबिवली परिसरात त्याने रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यास सुरुवात केली आणि तो मानपाडा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांच्या केलेल्या चौकशीत त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. चोरीचा सर्व पैसा त्याने बाई आणि बाटलीवर उधळला. त्याने दिलेल्या कबुलीवरून मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

First Published on: December 30, 2020 7:14 AM
Exit mobile version