‘कमल का फूल, बडी भूल’, जसवंत सिंहांचा मुलगा काँग्रेसमध्ये!

‘कमल का फूल, बडी भूल’, जसवंत सिंहांचा मुलगा काँग्रेसमध्ये!

आमदार मनवेंद्र सिंह

आपली संपूर्ण राजकीय हयात भाजपसाठी काम करणारे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांना भाजपने २०१४मध्ये तिकीट नाकारल्यानंतर पक्षातूनही काढून टाकलं. आता त्यांच्या मुलानेही भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. जसवंत सिंहांचे पुत्र मनवेंद्रसिंह यांनी मागच्याच महिन्यात त्यांच्या ‘स्वाभिमान यात्रे’मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात होतं. आता त्यात आणखीन एका धक्क्याची भर पडली आहे. मनवेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय काँग्रेस प्रवेश जाहीर करताना ‘कमल का फूल, बडी भूल’, अशा शब्दांत त्यांनी टोमणा देखील मारला आहे.

‘…आता माझा संयम सुटला आहे!’

मागील महिन्यात २२ सप्टेंबरला मनवेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ त्यांनी त्यांच्या बारमेर मतदार संघात स्वाभिमान रॅली काढली. या रॅलीमध्ये त्यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं. ‘आत्तापर्यंत ‘गौरव’, ‘संकल्प’ अशा अनेक रॅली निघाल्या. पण ही रॅली वेगळी आहे. ही स्वाभिमानासाठीची रॅली आहे. स्वाभिमान हा आमचा हक्क आहे. आता माझा संयम सुटला आहे आणि आता बोलायची खरी वेळ आली आहे,’ असं ते या रॅलीमध्ये बोलताना म्हणाले.

राजस्थानमध्ये भाजपपुढे मोठं आव्हान

जसवंत सिंह यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या बारमेर मतदार संघातून तिकीट नाकारल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर जसवंत सिंह यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ‘भाजपने जसवंत सिंह यांना फसवलं आहे’ अशा शब्दांत मनवेंद्र सिंह यांनी आपला राग व्यक्त केला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपला राजस्थानमध्ये ताकद पणाला लावावी लागेल हे नक्की!


हेही वाचा – ‘शशी थरूर हा ‘नीच आदमी’!

First Published on: October 16, 2018 6:57 PM
Exit mobile version