निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा राजकारणाला आणि राजकीय खेळींना रंग चढू लागला आहे. त्या अनुषंगाने १९९२नंतर देशात प्रत्येक निवडणुकीवेळी उचलला जाणारा आणि खेळवला जाणारा मुद्दा म्हणजे अयोध्येतील राम मंदिरही पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यावरून देशातले प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस आणि भाजपा एकमेकांना ऐकवू लागले आहेत. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी बाबरी मस्जिद आणि राम मंदिराबाबत केलेल्या एका वक्तव्यावर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी थेट निशाणा साधत ‘शशी थरूर नीच आदमी’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – उद्धव ठाकरेंना अयोध्येचे निमंत्रण; दसऱ्यानंतर राम मंदिराची वीट रचणार?
काय बोलले होते शशी थरूर?
राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘दुसऱ्या कुणाच्या प्रार्थनेची जागा उद्ध्वस्त करून राम मंदिर बांधण्याची कुणाही चांगल्या हिंदूची इच्छा नसेल’, असं वक्तव्य शशी थरूर यांनी केलं होतं. ‘हिंदू लिट फॉर लाइफ डायलॉग २०१८’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘भारतातल्या हिंदूंना अयोध्या रामाचं जन्मस्थान आहे, यावर विश्वास आहे. मात्र, कोणत्याही हिंदूला उद्ध्वस्त ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं जावं असं वाटत नसेल’, असंही थरूर यावेळी म्हणाले.
Now media is adopting double standards in the Me Too matter. GST has been chargesheeted for assisting his wife to kill herself and is out on bail. Yet no demand that he resign. Media is despite projecting his idiotic views on Ram Temple. MJ Akbar has only allegations just yet.!
— Subramanian Swamy (@Swamy39) October 15, 2018
सुब्रह्मण्यम स्वामींनी केली निंदा
दरम्यान, भाजप नेते सुब्रह्ममण्यम स्वामी यांनी मात्र शशी थरूर यांच्या या वक्तव्याची निंदा केली आहे. ‘शशी थरूर यांनी केलेलं वक्तव्य हे अनाकलनीय आहे. शशी थरूर हा ‘नीच माणूस’ आहे. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा माणसाबद्दल मी काय बोलणार?’ अशा शब्दांत सुब्रह्मण्यम स्वामींनी शशी थरूर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलंत का? – सुप्रीम कोर्ट आमचं, राम मंदिर होणारंच; भाजप आमदार बरळला