दोन मुले गमावली, पतीचीही साथ सुटली; द्रौपदी मुर्मूंचं आयुष्य होतं खूपच खडतर

दोन मुले गमावली, पतीचीही साथ सुटली; द्रौपदी मुर्मूंचं आयुष्य होतं खूपच खडतर

राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर होताच या पदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे साऱ्यांचे लक्ष होते. एनडीएकडून अनेक लोकांची नावे शर्यतीत होती. मात्र, एनडीएकडून आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. झारखंडच्या राज्यपाल राहिलेल्या आणि आता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास निश्चितच सोपा नव्हता. शिक्षक, क्लर्क, नगरसेवक, राज्यपाल आणि आता राष्ट्रपती पदांपर्यंत पोहोचताना त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण या काळात त्यांना त्यांच्या दोन मुलांसह आपल्या पतीलाही गमवावं लागलं. मात्र, यावरही मात करत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरूच ठेवला. (Two sons and husband died, draupadi murmu lived a very tough life)

हेही वाचा – मोठी बातमी! द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, ५० टक्क्यांहून अधिक मतांनी विजयी

२० जून १९५८ मध्ये ओदिसामध्ये मयूरभंज जिल्ह्यातील संथाल समाजातील गरीब आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जिल्ह्यातीलच शाळेच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भुवनेश्वर रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त होताच त्यांनी शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. १९७९ ते १९८३ काळात पाटबंधारे आणि विद्युत विभागात त्या कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. तसंच, १९९४ ते १९९७ काळात श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटर, रायरंगपूर येथे त्यांनी मानद सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलं. त्यांनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

राजकीय प्रवासाला सुरुवात

वॉर्ड कॉऊन्सलरपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. रायरंगपूर नगर परिषदेत त्या १९९७ साली नगरसेवक म्हणून निवडून आल्या. काही काळ त्यांनी नगर परिषदेचं उपाध्यक्षपदही स्विकारलं. तसंच, भाजपच्या तिकिटावरून रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या २००० आणि २००९ साली आमदार झाल्या. नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं.

हेही वाचा – दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती

दरम्यान, झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपालही राहिल्या आहेत. तसेच, आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याही त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या होत्या. त्यात आता त्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

वैयक्तिक आयुष्य होतं फार खडतर

द्रौपदी मुर्मू यांचा १९८० मध्ये श्याम चरण मुर्मूंसोबत प्रेमविवाह झाला. त्यांना तीन आपत्ये होती. दोन मुले आणि एक मुलगी. मात्र, दुर्दैवाने त्यांनी आपल्या दोन मुलांना गमावले. तर, आता एक मुलगी एका बँकेत नोकरीला आहे. २००९ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मोठ्या मुलाच्या दुःखातून त्या सावरत नाहीत तोवर २०१३ मध्ये त्यांनी त्यांचा दुसरा मुलगा गमावला. आपली दोन्ही मुले गमावल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना तिसरा धक्का बसला तो त्यांच्या पतीच्या निधनाचा. २०१४ मध्ये पतीनेही त्यांची साथ सोडली. या सर्व धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांनी पहारपूरमधील घराचे शाळेत रुपांतर करून मुलांमध्ये वेळ रमवला.

 

First Published on: July 21, 2022 8:58 PM
Exit mobile version