‘वाचू का’ प्रकरणावर जयंत पाटलांनी डिवचले; म्हणाले, शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीसांच्याच हातात!

‘वाचू का’ प्रकरणावर जयंत पाटलांनी डिवचले; म्हणाले, शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीसांच्याच हातात!

मुंबई – मुंबई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्याकरता शिंदे-फडणवीस सरकारने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पत्रकार परिषद सुरू होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परवानगी घेतली. वाचू का ? असा प्रश्न विचारताच वाचायची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या वाचू का यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

लिहिलेले वाचून दाखवण्यासाठी देखील शेजाऱ्याची आज्ञा घ्यावी लागते, अशी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर पाळी आलेली आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने शिंदे गटाचे रेटिंग कमी झालेच मात्र त्यासोबतच भाजपचेही रेटिंग कमी झाले. भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. असंगाशी संग केल्यावर काय होते याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाले तर शिंदेगटाला आणि उद्धव ठाकरेंना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आले, असं जयंत पाटील म्हणाले. एवढंच नव्हे तर शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीसच करत आहेत, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.

हेही वाचा – हृदयात सावरकर असते तर…, ‘वाचू का’ विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोला

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. “आता झाले ना ९ महिने! बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात. कागद वाचायचा निर्णय घेण्यासाठी पण अजूनही ‘सुपर सीएम’च लागतात का तुम्हाला? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला म्हणे!,’ अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

तर, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कागद वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात सावरकर असते तर त्यांनी उत्स्फूर्तपणे मानवंदना द्यायला हवी होती. पण ते उपमुख्यमंत्र्यांना विचारतात वाचू का, यालाच गुलामी म्हणतात, असं टीकास्त्र राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी डागलं.

हेही वाचा – राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

याआधी अनेकदा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलण्यास सुरुवात केली आहे. भर विधानसभेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना प्रॉम्प्ट करताना दिसले. त्यामुळे सत्तेत बसून आता जवळपास वर्ष होत आले तरीही मुख्यमंत्री स्वतःची ठाम भूमिका मांडू शकत नाहीत का? असा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

First Published on: March 29, 2023 10:12 AM
Exit mobile version