काळजी घ्या! पुण्यात सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट, मुंबईतील रुग्णसंख्या कालपेक्षा दुप्पट

काळजी घ्या! पुण्यात सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट, मुंबईतील रुग्णसंख्या कालपेक्षा दुप्पट

काही महिने विश्रांती घेतलेल्या कोरोनाने (Corona virus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच, आज पुण्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट (New corona variant)सापडला आहे. तर, मुंबईत नव्या कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असल्याचं स्पष्ट होत असल्याने पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. (New corona variant found in pune, double positive patients in mumbai)

नवा व्हेरियंट सापडला

पुण्यातील एका ३१ वर्षीय महिलेमध्ये कोरोनाचा नव्या व्हेरियंट (new corona variant) सापडल्याची माहिती समोर आली आहे. बी. ए 5 (B.A.5) असं या व्हेरियंटचं नाव असून या महिलेवर घरीच उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

राज्यात आज नवे १८८१ रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत १८८१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ८७८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे राज्यात सध्या ८ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका वाढला, मास्कबाबत टोपेंनी केले महत्त्वाचे विधान

मुंबईत वाढले दुप्पटीने रुग्ण

मुंबईत आज १२४२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेसमोरील आव्हान वाढले आहे. काल, ६ जून रोजी मुबंईत ६७६ रुग्ण सापडले होते. तर, आज १२४२ रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. एका दिवसांत हा आकडा दुप्पटीने वाढला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – ५९७४
ठाणे -१३१०
पालघर – १४८
रायगड – २२८
रत्नागिरी – १७
सिंधुदुर्ग – ७
पुणे – ५६२

दरम्यान, एका आठवड्यात पालघरमध्ये ३५० टक्के रुग्ण वाढले असून ठाण्यात १९२ टक्के रुग्णांची वाढ झाली आहे. तर, मुंबईत १३५ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. रायगड, पुणे जिल्ह्यातही १३५ टक्के वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. १०० टक्क्यांहून अधिक रुग्णवाढ नोंदवण्यात येत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका संभवत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

चाचण्या वाढवण्याचे आदेश

रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचे (Increasing in testing) आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. ताप, सर्दी, खोकल्यासारखे लक्षण आढळल्यास कोरोना चाचणी करण्याचे सांगण्यात आले असून सध्या दिवसभरात २५ हजार चाचण्या होत असल्याची माहिती टोपेंनी दिली.

First Published on: June 7, 2022 7:39 PM
Exit mobile version